पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संतसाहित्याविषयी आस्था होती. संत तुकाराम महाराज यांची ओवी ‘मूक नायक’ वृत्तपत्रामध्ये ब्रिदवाक्य म्हणून प्रसिद्ध केली जात असे. महामाता रमाई यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावे देण्यात येत असलेला पुरस्कार ही योग्य कृती आहे, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय समितीतर्फे आयोजित महामाता रमाई महोत्सवात आज (दि. ७) रमाईरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याने महोत्सवाचा समारोप झाला. माजी आमदार दीपक पायगुडे आणि लताताई राजगुरू यांचा रमाईरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. पंचशील शाल, ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष सचिन ईटकर, संयोजक विठ्ठल गायकवाड, बार्टीचे संचालक सुनील वारे, के. एस. सूर्यवंशी, कुणाल राजगुरू, बाबू वागस्कर, मेहबुब नदाफ मंचावर होते.
सुरुवातीस महोत्सवाच्या १३ वर्षांतील वाटचालीचा आढावा ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात सादर केला. चांगल्या कामाचा संकल्प करणे ही खऱ्या अर्थाने महामाता रमाई यांना आदरांजली ठरेल, असे मत सचिन ईटकर यांनी व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना दीपक पायगुडे म्हणाले, सामाजिक कार्य करणे वाटते तितके सोपे नाही. कौतुक होते त्याचप्रमाणे टीकाही सहन करावी लागते. सामाजिक कार्यातील वाटचालीसाठी महामाता रमाई यांच्या नावे मिळालेला पुरस्कार प्रेरणादायी ठरेल. पुरस्काराविषयी लता राजगुरू यांनी आनंद व्यक्त केला. सुनील वारे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार कुणाल राजगुरू यांनी मानले.

