नागपूर येथील प्लांटमध्ये 2028 पासून उत्पादनास सुरुवात
नागपूर,: महाराष्ट्रातील नागपूर येथे ऑटोमोबाईल्स आणि ट्रॅक्टरसाठी आपला सर्वात मोठा एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा महिंद्रा ग्रुपने आज केली आहे. ग्रुपच्या दीर्घकालीन विकास धोरणातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ या तीन दिवसीय कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. या अंतर्गत भारताच्या उत्पादन नकाशावर विदर्भाला एक उदयोन्मुख औद्योगिक विकास केंद्र म्हणून सादर केले जात आहे.
विदर्भात 1500 एकर जागेवर हा अत्याधुनिक प्लांट विकसित केला जाईल, ज्याला संभाजीनगरमधील 150 एकरच्या सप्लायर पार्कची जोड दिली जाईल.
पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर, या कारखान्याची वार्षिक उत्पादन क्षमता ५ लाखांहून अधिक वाहने आणि १ लाख ट्रॅक्टर इतकी असेल, ज्यामुळे हा महिंद्राचा देशातील सर्वात मोठा सर्वसामावेशक उत्पादन प्लांट ठरेल.
विदर्भाचे अनेक धोरणात्मक फायदे आहेत. यात समृद्धी महामार्गाद्वारे उत्कृष्ट रस्ते जोडणी, मजबूत रेल्वे जाळे, प्रमुख देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठांमध्ये सुलभ प्रवेश आणि वेगाने विकसित होणारी औद्योगिक परिसंस्था यांचा समावेश आहे. भागीदारीद्वारे संभाजीनगर येथील सप्लायर पार्क सुधारित लॉजिस्टिक्स कार्यक्षमतेद्वारे आणि वाढीव स्थानिकीकरणाद्वारे उत्पादन मूल्य साखळीला बळकटी देईल. नागपूर येथील नवीन प्रकल्पासाठी, तसेच महिंद्राच्या चाकण आणि नाशिक येथील विद्यमान प्रकल्पांसाठीही हे पार्क सुटे भाग पुरवेल.
NU_IQ आर्किटेक्चरचा समावेश असलेल्या महिंद्रा ऑटोच्या पुढील पिढीच्या प्लॅटफॉर्मला ही ऑटोमोटिव्ह सुविधा समर्थन देईल. आणि देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठांसाठी अनेक पॉवरट्रेन (ICE, EV आणि भविष्यातील तंत्रज्ञान) असलेल्या वाहनांचे उत्पादन करण्यास सक्षम असेल. प्रगत ऑटोमेशन आणि डिजिटल उत्पादन प्रणालींनी सुसज्ज असलेला हा प्रकल्प नावीन्य, गुणवत्ता आणि शाश्वतते संबंधातील महिंद्राची वचनबद्धता दर्शवेल. तसेच वाढत्या देशांतर्गत मागणीची आणि प्रमुख निर्यात बाजारपेठांची पूर्तता करून ट्रॅक्टर उत्पादन युनिट, शेती उपकरणे क्षेत्रातील महिंद्राचे नेतृत्व आणखी मजबूत करेल.
याव्यतिरिक्त, महिंद्रा सध्याच्या उत्पादन आणि इंजिन क्षमतांचा विस्तार करण्यासाठी, तसेच आपल्या प्रगत तंत्रज्ञान व्यवसायाच्या वाढीला चालना देण्यासाठी इगतपुरी-नाशिक परिसरात जमीन संपादित करणार आहे.
या उपक्रमांद्वारे, महिंद्रा महाराष्ट्रात 10 वर्षांच्या कालावधीसाठी 15,000 कोटी रुपयांची सर्वसमावेशक गुंतवणूक करणार आहे आणि आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी तीन ठिकाणी 2000 एकरपेक्षा जास्त जमीन संपादित करेल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले: “महाराष्ट्रात आपला सर्वात मोठा ऑटो आणि ट्रॅक्टर उत्पादन प्रकल्प उभारण्याचा महिंद्राने घेतलेला निर्णय म्हणजे राज्याच्या मजबूत औद्योगिक परिसंस्थेचे आणि प्रगतिशील धोरणात्मक चौकटीवर केलेले शिक्कामोर्तब आहे. या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, विदर्भ आणि आसपासच्या परिसराचा प्रादेशिक विकास वेगाने होईल आणि भारतातील एक अग्रगण्य उत्पादन केंद्र म्हणून महाराष्ट्राचे स्थान आणखी मजबूत होईल.”
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि सीईओ, ऑटो आणि फार्म सेक्टर, राजेश जेजुरीकर म्हणाले: “हा कारखाना म्हणजे महिंद्राच्या उत्पादन प्रवासातील एक धाडसी पाऊल आहे. भविष्यातील आमची वाहने आणि ट्रॅक्टर यांना पाठिंबा देण्यासाठी तयार करण्यात आलेला हा प्लांट, एकात्मिक स्वरूपात मोठ्या प्रमाणावरील उत्पादन, लवचिकता आणि प्रगत तंत्रज्ञान एकत्र आणते. ‘जगासाठी भारतात उत्पादन‘ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी प्रामाणिक राहून जागतिक दर्जाची उत्पादने वितरीत करण्याची आमची क्षमता यामुळे अधिक मजबूत होते. या परिवर्तनकारी गुंतवणुकीद्वारे महाराष्ट्र राज्यासोबतची आमची भागीदारी अधिक दृढ करताना आम्हाला अभिमान वाटतो.”
या नवीन उत्पादन संकुलाद्वारे, नावीन्य, टिकाऊपणा आणि जागतिक स्पर्धात्मकतेवर आधारित, गतिशीलता तसेच कृषी यांत्रिकीकरणाचे भविष्य घडवण्याच्या आपल्या दृष्टिकोनाला महिंद्रा गती देत आहे. यासोबतच भारताच्या औद्योगिक विकासातही महत्त्वपूर्ण योगदान देतो आहे.

