पुणे, दि.६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता. १२ वी. HSC परीक्षा) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी. एसएससी परीक्षा) १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते १८ मार्च २०२६ रात्री ८ वाजेपर्यंत पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, गैरप्रकार होऊ नये, परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याकरीता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मनाई आदेश जारी केले आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षाकेंद्राच्या परिसरात व त्यासभोवतालच्या १०० मीटर परिसरात इतर कोणत्याही व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्राचे परिसरात दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करीत आहे. या केंद्रावर परीक्षेस बसलेले परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा अधिकारी यांना आदेशातून सूट देण्यात आली आहे.
परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरातील सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी,आयएसडी,बुथ, फॅक्स केंद्रे,झेरॉक्स सेंटर्स,ई-मेल इंटरनेट सुविधा, लॅपटॉप,मोबाईल,प्रसारमाध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवावीत. परीक्षा केंद्रांवर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॉझिस्टर, रेडिओ, कॅलक्युलेटर, लॅपटॉप परिक्षा केंद्रावर जवळ बाळगण्यास व परिसराचे १०० मीटर सभोवतालच्या परिसरात वापरण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेचे कलम 223 प्रमाणे दंडनीय पात्र राहतील असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

