मुंबई – लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली अमिट छाप आजही तितकीच तेजस्वी आहे. तमाशा परंपरेतील लोकसाहित्याचा अविभाज्य घटक असलेल्या वगनाट्याने एकेकाळी समाजप्रबोधनाची ज्योत प्रखरतेने पेटवून समाजाला दिशा दिली. काळाच्या प्रवाहात अनेक बदल झाले असले तरी या परंपरेची मुळे संस्कृतीच्या मातीत घट्ट रोवलेली असल्याने वगनाट्याची परंपरा आणि योगदान सांस्कृतिक क्षेत्रात अधोरेखित करणारे ठरते, असे प्रखर मत लोककला अभ्यासकांनी व्यक्त केले.
‘वगनाट्याची मौखिक परंपरा व योगदान’ या विषयावर गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत सरकारच्या साहित्य अकादेमी तसेच मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी आणि शाहीर अमरशेख अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनात लोककला अभ्यासकांचे एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, पद्मश्री प्रा. वामन केंद्रे, लोककला अकादमीचे माजी प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे तसेच साहित्य अकादेमीचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नागर यांची विशेष उपस्थिती होती.
या चर्चासत्रात वगनाट्य अभ्यासक प्रभाकर होवाळ, सोपान खुडे, डॉ. संतोष खेडलेकर, अभ्यासक-अभिनेते आदेश बांदेकर, मंत्रालयातील ज्येष्ठ पत्रकार खंडुराज गायकवाड, मुंबई विद्यापीठाच्या प्रा. डॉ. शामल गरुड, शिवाजी विद्यापीठाचे प्रा. रणधीर शिंदे यांनी आपापली संशोधनपत्रे सादर केली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे लोककला अकादमीचे निमंत्रित व्याख्याते आणि तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांना यावर्षी भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लोककला अकादमीच्या वतीने करण्यात आलेला विशेष सत्कार. यावेळी सत्काराला उत्तर देताना खेडकर म्हणाले की, “भारत सरकारने केलेला हा सन्मान लोककला क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
या राष्ट्रीय चर्चासत्राचे नियोजन लोककला अकादमी प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राज्यगीताने झाली. त्यानंतर नृत्य आणि गायन सादरीकरणांनी उपस्थितांची दाद मिळवली.
डॉ. मोनिका ठक्कर यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. शिवाजी वाघमारे, हेमाली शेडगे, कृष्णा मुसळे ,योगेश चिकटगावकर विकास कोकाटे, पराग कुलकर्णी, जमीर शेख, अंतरीक्ष खरात, यशवंत जाधव, गोविंद मार्शिवणीकर, राजेंद्र कदम, दिलीप गुरव, संगीता बाई लोखंडे तसेच लोककला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी पडद्यामागील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.
परिसंवादात बोलताना अभ्यासकांनी स्पष्ट केले की, वगनाट्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक जाणीवा जागृत करणारे प्रभावी लोकशिक्षणाचे व्यासपीठ राहिले आहे. बदलत्या काळानुसार सादरीकरणात नवकल्पना आणताना मूळ परंपरेचे जतन करणे ही तमाशा कलावंतांची सांस्कृतिक जबाबदारी असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लोकपरंपरेचा समृद्ध वारसा पुढील पिढीकडे सक्षमपणे पोहोचवण्यासाठी तमाशा कलावंतांनी वगनाट्याची परंपरा जपली पाहिजे, असेही यावेळी नमूद करण्यात आले. या चर्चासत्रातून वगनाट्याच्या समृद्ध परंपरेचा वारसा आणि समाजघडणीत त्याचे मोलाचे योगदान अधोरेखित झाले.

