नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोदींसोबत संसदेत काही अघटित होण्याची शक्यता असल्यामुळे आपण त्यांना सभागृहात न येण्याची विनंती केल्याचे सांगितले होते.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा ठाम दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी कोणती क्रांती केली की, लोक त्यांच्यावर हल्ला करतील. ते अत्यंत नॉर्मल जीवन जगत आहेत. मजा करत आहेत. परदेशात जात आहेत, असे ते मोदींना खोचक टोला हाणताना म्हणालेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांनी संसदेत बोलू दिले नसल्याचा आरोप होत आहे. विशेषतः लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोदींसोबत संसदेत काही अघटित होण्याची शक्यता असल्यामुळे आपण त्यांना सभागृहात न येण्याची विनंती केल्याचे सांगितले होते. त्यांच्या या विधानावर देशाच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा झडत असताना संजय राऊत यांनी मोदींची सुरक्षा उच्च कोटीची असल्याचा दावा करत त्यांच्यावर हल्ला होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा ठाम दावा केला आहे.
संजय राऊत शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, या जगात सर्वात सुरक्षित कुणी असेल तर ते या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांची सुरक्षा व्यवस्था इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याहून जबरदस्त आहे. त्यानंतरही त्यांना का असुरक्षित वाटत आहे हे मला माहिती नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशासाठी खलिस्तान्यांशी पंगा घेतला होता. जनरल वैद्य यांची हत्या झाली. राजीव गांधी यांना मारण्यात आले. राजीव गांधींनीही देश व सुरक्षेसाठी श्रीलंकेला मदत केली होती.
मोदींनी काय केले? पंतप्रधानांसोबत काहीही होणार नाही. ते आमचे पंतप्रधान आहेत. त्यांना काहीही होणार नाही. मोदींनी असे काय केले आहे की, लोक त्यांच्यावर हल्ला करतील. त्यांनी अशी कोणती क्रांतीकारी गोष्ट केली आहे? हे सांगा. त्यांनी काहीही केले नाही. ते नॉर्मल जीवन जगत आहेत. मजा करत आहेत. परदेशात जात आहेत. विशेष विमान आहे. जो व्यक्ती आपल्या पदाचा आनंद घेत आहे, त्याच्यावर कोण कशाला हल्ला करेल? असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी यावेळी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर मानहाणीचा गुन्हा दाखल केल्याचीही माहिती दिली. मी नारायणराव राणे यांच्यावर मानहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. कारण, ते खोटे बोललेत. शिवसेनेत कुणाला कोणते पद द्यावे, हा सर्वस्वी अधिकार शिवसेनाप्रमुख किंवा शिवसेना पक्षप्रमुख यांचा असतो. ते आम्हाला निर्देश देतात. त्यानुसार मग कुणी विरोधी पक्षनेता होतो, कुणी खासदार होतो. कुणी नेता होतो. त्या निर्देशांनुसार मी खासदार झालो, असे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा उल्लेख उपरोधिकपणे महात्मा म्हणूनही केला. आता आपण सत्र न्यायालयाच्या खाली उभे आहोत. 54 नंबरच्या न्यायालयात आमच्या सगळ्यांचे प्रिय महात्मा किरीट सोमय्या यांनी आमच्यावर खटला दाखल केला होता. त्यावर आम्ही अपिलात गेलो आहोत. त्यावर आता एकमेकांच्या भूमिका मांडण्याचे काम सुरू होते. त्यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. आमच्याही वकिलांनी आमची बाजू जोरदारपणे मांडली. पुढे काय होते ते पाहू, असे ते म्हणालेत.

