मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. 7 फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्वीकारले जाणार असून, 11 फेब्रुवारीला नव्या महापौराची अधिकृत घोषणा होणार आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वीच एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेसह निवडणूक लढवलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने महायुतीला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीच्या गणितात महायुतीची ताकद आणखी वाढली आहे.
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरे गटाची सत्ता उलथवून भाजप-नेतृत्वाखालील युती सत्तेत आली आहे. या निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या असून, शिंदे गटाच्या शिवसेनेने 29 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला 3, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला 1 तर समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत.
महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाआधी सर्वच पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मतदानाआधी शहर सोडू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंगणेवाडी जत्रेमुळे कोकण पट्ट्यातील काही नगरसेवक बाहेरगावी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बाब लक्षात घेता सर्वच पक्षांकडून अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे. स्पष्ट बहुमत नसतानाही शिवसेना (ठाकरे गट) ने आपल्या नगरसेवकांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुंबई सोडू नका, असे आदेश दिले आहेत.
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनीही आपल्या नगरसेवकांना सूचना दिल्या आहेत. 8 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने काही नगरसेवक बाहेर जाण्याची शक्यता असली तरी, 10 फेब्रुवारीपर्यंत अनिवार्यपणे मुंबईत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापौर निवडणूक तोंडावर असताना संख्याबळ टिकवण्यासाठी सर्वच पक्ष सतर्क झाले असून, येत्या काही दिवसांत मुंबईतील राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

