पुणे —
महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक जाहीर झाली असून साहित्य संवर्धन आघाडीच्या वतीने नुकताच जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आजीव सभासदांची माहिती अद्ययावत व पारदर्शक करण्यासाठी साहित्य संवर्धन आघाडीने sahityasa.com ही विशेष वेबसाइट विकसित केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये सुमारे १६ हजार आजीव सभासद असून मागील ११ वर्षांपासून त्यांची यादी अद्ययावत करण्यात आलेली नव्हती, अशी माहिती आघाडीचे उमेदवार प्रसाद मिरासदार आणि सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साहित्य संवर्धन आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कुणाल ओंबसे उपस्थित होते. मिरासदार यांनी सांगितले की, राज्यभरात आमचे उमेदवार प्रचार दौरे करत असून निवडणूक जिंकल्यानंतर विविध साहित्यिक उपक्रम राबवले जातील. sahityasa.com या वेबसाइटवर साहित्य संवर्धन आघाडीचे स्वतंत्र पेज असून त्यामध्ये रेकॉर्ड कॉलमद्वारे पिनकोड, नाव किंवा मोबाईल क्रमांक टाकून आजीव सभासदांना आपला मतदार क्रमांक, पत्ता आणि इतर माहिती तात्काळ पाहता येणार आहे.
प्रथमच सोप्या आणि मराठी भाषेत असे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून आडनावानुसार मतदार यादी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये मतदार यादी क्रमांक तसेच पत्त्याची तपासणीही करता येणार आहे. अनेक सभासदांना आजीव सदस्य कोण आहेत याचीही माहिती नसते, मात्र या वेबसाइटमुळे ती माहिती आता सहज उपलब्ध होणार आहे. तसेच निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांची सविस्तर माहितीही याठिकाणी पाहता येईल.
सुनील महाजन यांनी सांगितले की, आम्ही निवडून आल्यावर काय करणार आहोत हे स्पष्टपणे मांडत आहोत. विरोधकांनी आतापर्यंत पदे भूषवून काय केले, यावर टीका करण्यात आम्ही वेळ घालवणार नाही. आजीव सभासद आणि साहित्य परिषद यांचा संपर्क तुटलेला असून तो पुन्हा मजबूत करणे आवश्यक आहे. आम्ही अवघ्या दहा दिवसांत ही वेबसाइट आणि ॲप तयार केले, मात्र मागील ११ वर्षांत सध्याच्या पदाधिकाऱ्यांना ते करता आले नाही. अनेक साहित्यिकांचे पत्ते बदलले, काहींचे निधन झाले, तरीही यादी अद्ययावत करण्यात आलेली नाही. ही यादी नीटनेटकी आणि अद्ययावत करण्याचे काम साहित्य संवर्धन आघाडी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


