एक टँकर पलटी झाला आणि २४ तास मुंबई – पुणे एक्सप्रेस वे ठप्प झाला. ९२ किमीचा हाईवे टोल ३२०/- आणि एका टँकर गॅस लीकनंतर २४ तास बंद.
मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली टोल नाक्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या 24 तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. अशाही स्थितीत प्रवाशांकडून टोल वसुलीकेली जात असल्याने लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यावर टोल वसुली न करण्याच्या सूचना देऊ असं सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगतिले आहे .
मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ एक केमिकल वाहून नेणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक, जुना मुंबई- पुणे हायवे जॅम झाला. या गोष्टीला जवळपास 24 तास झाले असले तरी तो टँकर बाजूला काढण्यामध्ये प्रशासनाला अपयश आल्याचं दिसतंय.
या हायवेवर टँकर पलटी झाला असतानाही या ठिकाणी आरआरबीचे कोणतेही अधिकारी किंवा प्रशासनाचे कोणतेही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे जुन्या महामार्गावरुन मोठ्या संख्येनं प्रवासी निघाल्याने खोपोलीजवळ वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. महत्त्वाचं म्हणजे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची सूचना प्रशासनाने दिली नाही. त्यामुळेच अनेक प्रवाशांवर या ठिकाणी गेल्या 24 तासांपासून ट्रॅफिकमध्ये अडकण्याची नामुष्की आल्याचं दिसून आलं. यामुळेच प्रवाशांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
एकीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. अशाही परिस्थितीत या महामार्गावर टोल वसुली केली जात असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. यावर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना प्रश्न विचारले गेलेत .
इंद्रनील नाईक म्हणाले की, “तूर्तास हा मार्ग मोकळा करण्यासाठी प्राथमिकता आहे. ही घटना आज घडली आहे ती चुकीची असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढणार आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यावरही भर देणार आहोत. याबाबत पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या वाहतूक कोंडीनंतर त्या ठिकाणी टोल वसुली न करण्याच्या सूचना आम्ही देऊ.”
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका पहाटेच्या सुमारास प्रवास करणाऱ्यांना बसल्याचं दिसून आलं. तसेच या वाहतूक कोंडीत काही कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि इतर गंभीर आजारी रुग्ण अडकल्याची माहिती आहे. तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय करण्यात आलेली नाही. मात्र टोलनाक्यांवर टोलवसूली मात्र न चूकता सुरूच आहे. निर्ढावलेले टोल कर्मचारी वाहतूक कोंडीची माहिती देत नसल्याने, संतापात आणखीनच भर पडली.

