पुणे-आपण शेकडो लोकांना भेटत असतो. त्यांचे निरीक्षण करीत त्यांच्या आठवणी शब्दात उतरवणे ही सुंदर कला आहे. त्यातून तयार झालेले साहित्य मनाला आनंद देते. प्रत्येकानेच जीवनातील आठवणींना लिखाणातून उजाळा देत सदैव कृतज्ञता व्यक्त करावी. ‘मला भावलेली माणसे’ हे पुस्तक एखाद्याला आठवणीत ठेवण्यास आणि कृतज्ञ राहण्यास प्रेरित करते. तसेच साहित्यातील सहप्रवासी बनल्याचा देखील आनंद देते. मानवी अनुभवांना मूर्त रूप देणे हे एक महत्त्वाचे काम आहे. असे उद्गार मुंबई दूरदर्शनचे माजी महासंचालक व एम.आय.टी. च्या जर्नालीझम व फिल्म विभागाचे डायरेक्टर डॉ. मुकेश शर्मा यांनी आज काढले. ’मला भावलेली माणसे’ या सौ. तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. दयानंद घोटकर होते. नवनिर्वाचित नगरसेविका सौ. ज्योस्त्ना जगन्नाथ कुलकर्णी व जगन्नाथ कुलकर्णी या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. दयानंद घोटकर यांनी तन्मयी यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले: “तन्मयी उत्तम गाते, तबला वाजवते, कीर्तन करते आणि आता लिहिते सुद्धा. हे सर्व गुण एकाच ठिकाणी असणे दुर्मिळ आहे” असे सांगून ते म्हणाले की, जे बोलले जाते ते हवेत विरून जाते, पण जे छापले जाते ते अक्षर (अक्षय) राहते. त्यामुळे लिहीत रहा” असे त्यांनी सांगितले.
वेदशास्त्रोत्तेजक सभागृह पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी स्वामी समर्थ प्रतिमा पूजन आणि त्यानंतर ‘निघालो घेऊन’ दत्ताची पालखी गाण्याचे गायन तन्मयी यांनी केले. पुस्तक प्रकाशन व ई-बुक आवृत्ती प्रकाशन झाल्यानंतर प्रकाशक तनया-इशा प्रकाशनचे प्रवीण.प्र.वाळिंबे. यांनी प्रास्ताविक केले. नचिकेत मेहेंदळे व अनिकेत कुलकर्णी यांनी पाहुण्यांचे पुणेरी पगडी घालून स्वागत केले. याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेविका सौ. ज्योस्त्ना जगन्नाथ कुलकर्णी व श्री. जगन्नाथ कुलकर्णी यांनीही मनोगते व्यक्त केली. ह भ प. कीर्तन विशारद सौ. निवेदिता खळदकर – मेहेंदळे यांनी सूत्रसंचालन केले. हुजूरपागा प्रशाला,पुणेच्या मुख्याध्यापिका सौ. नम्रता मेहेंदळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास साहित्यप्रेमींची मोठी गर्दी होती.
‘मला भावलेली माणसे’ या पुस्तकात लेखिका सौ. तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी यांनी त्यांना भेटलेल्या पं. विश्व मोहन भट्ट, डॉ सतीश आळेकर, अर्चना कान्हेरे, उल्हास दादा पवार, बेगम परवीन सुलताना, डॉ विश्वास मेहेंदळे, डॉ कुमार सप्तर्षी, डॉ रेवा नातू, डॉ मोहनकुमार दरेकर, कै. मुक्ता टिळक, विदुषी कौशिकी चक्रवर्ती, पं. विजय घाटे, नॅशनल क्रश, गिरीजा ओक – गोडबोले,अभिनेते दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, पं. अतुलकुमार उपाध्ये, उस्ताद उस्मान खान, ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, तालयोगी पं. सुरेश तळवलकर गुरुजी, पं. उल्हास कशाळकर, अभिनेत्री,रोहिणी हट्टंगडी यांची भावपूर्ण अशी हृदय व्यक्तिचित्रे आर्टिफिशियल इन्टॅलिजन्सच्या डिझायनींग चा वापर करून लिहिली आहेत. मराठी भाषेतील हे एआय डिझायनिंगचा वापर करून तयार केलेले ललित व्यक्तीचीत्रण लेखांचे पुस्तक आहे.

