पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि कै. कमलाबाई रारावीकर लिखित ‘ओव्या आजीच्या’ या पुस्तकांचे प्रकाशन ‘नरेडको माही’च्या राष्ट्रीय अध्यक्षा स्मिता पाटील आणि बालरंगभूमी चळवळीचे प्रणेते, लेखक-दिग्दर्शक प्रकाश पारखी यांच्या हस्ते झाले.
वारजे येथील ओव्हलनेस्ट सोसायटीच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रघुनाथ रारावीकर, लेखिका-दिग्दर्शिका विनिता पिंपळखरे, संयोजक प्रज्ञा रारावीकर-ठाकूर मंचावर होते. ठाकूर यांच्या संकेतस्थळाचे यावेळी उद्घाटन या वेळी करण्यात आले.
लेखनाविषयी बोलताना सुलभा रारावीकर म्हणाल्या, शिक्षिका म्हणून कार्यरत असताना शिक्षकांनी लिहिलेले नाटक स्नेहसंमेलनात सादर व्हावे अशा अपेक्षेमुळे विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर साध्या, सोप्या, सरळ भाषेत लिखाण करत गेले. ज्यातून महापुरुषांच्या कथा नाट्य रूपात साकारल्या.
स्वागतपर प्रास्ताविकात प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, ओव्या हा साहित्यप्रकार काळाच्या ओघात मागे पडल्याचे जाणवले. आजीने रचलेल्या आणि संकलित केलेल्या ओव्यांच्या पुस्तिकेच्या माध्यमातून हा पुढे आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच आई शिक्षिका व साहित्याची उत्तम जाणकार असल्यामुळे आणि पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त शिक्षण देण्याच्या इच्छेतून तिने लिहिलेल्या नाटिकांचे पुस्तकही या निमित्ताने प्रकाशित करण्यात आले आहे.
आपली संस्कृती लुप्त होत असताना मराठी भाषेतील साहित्य-संस्कृतीचा ठेवा ‘ओव्या आजीच्या’ या पुस्तकाच्या माध्यमातून जपला जात असून पुढील पिढीकडे प्रवाहीत होत आहे. समाजात सकारात्मकता निर्माण होण्यासाठी आणि मराठी भाषेची थोरवी टिकून रोहण्यासाठी अशा साहित्यकृतींची उपयुक्तता मोठ्या प्रमाणात आहे, असे मत स्मिता पाटील यांनी व्यक्त केले.
जाण असणाऱ्या शिक्षिकेचे अभ्यासपूर्ण लिखाण नाटिकांच्या माध्यमातून समोर आले आहे तसेच सहज गुणगुणता येईल, अशा शब्दांमध्ये रचलेल्या ओव्या मराठी संस्कृतीची ओळख दर्शवित आहेत, असे मत विनिता पिंपळखरे यांनी व्यक्त केले.
प्रकाश पारखी म्हणाले, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ या पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षकांनी केलेल्या शालेय स्तरावरील नाट्य चळवळीच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचेल. शालेय विद्यार्थ्यांसाठी नाटिकांचे पुस्तक लिहिणे गरजेचे आहे. सर्वसामान्य पालक फक्त अभ्यास आणि गुणांमागे धावत आहेत; परंतु मुलांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी अभ्यासविषयक नाटिकांमार्फत मुलांपर्यंत ज्ञान पोहोचल्यास विषयाचे आकलन होणे सोपे जाते.
मान्यवरांचे स्वागत अंबादास ठाकूर, प्रज्ञा ठाकूर, मृणालिनी गवांदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचित्रा ठकार यांनी तर आभार प्रज्ञा ठाकूर यांनी मानले.

