पुणे-
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कारभार अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने ‘साहित्य संवर्धन आघाडी’ने आपल्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. साहित्य चळवळीला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळावे, वाचनसंस्कृती बळकट व्हावी आणि नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम प्रभावीपणे व्हावे, यासाठी ठोस आणि कृतीशील कार्यक्रम राबवण्याचा निर्धार या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे.
जाहीरनाम्यानुसार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा संपूर्ण कारभार घटनात्मक चौकटीत, पारदर्शक पद्धतीने आणि सदस्याभिमुख पद्धतीने चालवला जाईल, असे आघाडीने स्पष्ट केले आहे. राज्यभर कार्यरत असलेल्या परिषदेच्या विविध जिल्हा शाखा अधिक सक्षम करण्यासाठी दरवर्षी ठराविक अर्थसाह्य देण्याचे धोरण राबवले जाईल. या निधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर साहित्यिक उपक्रम, वाचन चळवळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
दरवर्षी एका जिल्ह्यात विभागीय साहित्य संमेलन आयोजित करून स्थानिक लेखकांना दर्जेदार लेखनासाठी प्रेरणा देणे आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा जाहीरनाम्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच युवा लेखकांना योग्य दिशा मिळावी यासाठी लेखन कार्यशाळा, संवाद सत्रे आणि मार्गदर्शन शिबिरे शाखांच्या माध्यमातून राबवली जाणार आहेत.
परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या परीक्षांना राज्य शासनाची मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. या परीक्षांना विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी शाळा व महाविद्यालयांशी समन्वय साधण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वास्तूसाठी अधिक विस्तीर्ण जागा मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, तसेच परिषदेच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
परिषदेच्या आजीव सदस्यांना ग्रंथप्रकाशन व अन्य उपक्रमांसाठी सभागृह अत्यल्प शुल्कात उपलब्ध करून देणे आणि ‘साहित्य पत्रिका’ पुन्हा एकदा मुद्रित स्वरूपात प्रत्येक आजीव सदस्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णयही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तो सार्थ ठरेल असे कृतीशील कार्यक्रम राबवले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले.
‘पुणे पुस्तक महोत्सवा’ला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाचा उल्लेख करत यंदाच्या ‘१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या’ निमित्ताने कार्यक्षेत्रात १०० पुस्तक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले. तसेच ‘जिथे मराठी तेथे साहित्य परिषद’ या संकल्पनेतून जगभरातील मराठी माणसाला मराठीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
साहित्य निर्मिती करताना लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवणे, परप्रांतीयांमध्ये मराठीविषयी आस्था निर्माण करणे आणि लेखक, वाचक, प्रकाशक, वितरक व विक्रेते या सर्व घटकांसाठी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार आघाडीने व्यक्त केला आहे.
या निवडणुकीत ‘साहित्य संवर्धन आघाडी’कडून अध्यक्षपदासाठी योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदासाठी स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदासाठी प्रदीप निफाडकर हे उमेदवार आहेत. इतर पदासाठी आघाडीचे अन्य सात उमेदवार निवडणूक लढवत असून, या सर्व उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आजीव सदस्यांचा सक्रिय पाठिंबा अपेक्षित असल्याचे आवाहन आघाडीने केले आहे.
साहित्य संवर्धन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध
Date:

