मुंबई-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, सुनेत्रा पवार या पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अल्पावधीतच त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांची धुरा देण्यात आल्याने प्रशासनातही याची चर्चा सुरू आहे.
पुणे जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी जिल्ह्यांपैकी एक मानला जातो, तर बीड जिल्हा मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आल्याने त्यांच्या भूमिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार यांच्या कार्यशैलीचा वारसा पुढे नेत, जिल्हास्तरावरील विकासकामांना गती देण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सुनेत्रा पवार यांचे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय स्थान अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली असून, यासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अर्थखाते वगळता अजित पवारांकडे असलेली इतर सर्व खाती सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेचे राजकीय महत्त्व आणखी वाढले आहे.

पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे त्यांच्या हाती देण्यात आल्याची अधिकृत घोषणा शासनाकडून करण्यात आली. दरम्यान, सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील कार्यालयात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार मंत्रालयातून राज्यभरातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत असत, त्याच पद्धतीने सुनेत्रा पवारही कामकाज पाहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसह बीड जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला होता. बारामती हे त्यांचे कार्यक्षेत्र आणि जन्मभूमी असल्याने स्थानिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून शोक व्यक्त केला. त्याचप्रमाणे बीडमध्येही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत श्रद्धांजली वाहिली. गेल्या काही महिन्यांत बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी जिल्ह्यातील जनतेशी जवळीक साधली होती. त्यांच्या कामाच्या शैलीमुळे बीडकरांमध्ये त्यांच्याविषयी आत्मीयता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर बीडमध्ये उमटलेली प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली. आता त्या जिल्ह्याच्या पालकत्त्वाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे येत असल्याने त्या नात्याची सातत्याने जपणूक होणार का, याकडेही लक्ष लागले आहे.

