पुणे- महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) मंगळवारी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. महापौरपदी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महापौरपदासाठी भाजपतर्फे मंजुषा नागपुरे आणि वर्षा तापकीर यांच्यात चुरस होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी मंजुषा नागपुरे यांच्या नावावर अंतिम मोहोर उमटवली. उपमहापौरपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाचे परशुराम वाडेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यांनी निवडणुकीत कमळ चिन्हावर निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे, परशुराम वाडेकर यांच्या पत्नी सुनीता वाडेकर याही यापूर्वी पुण्याच्या उपमहापौर होत्या.त्यानंतर आता त्यांच्या पतीला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे वाडेकर दाम्पत्य हे उपमहापौर होणारे पहिले दाम्पत्य ठरले आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, गटनेते गणेश बीडकर, माजी मंत्री दिलीप कांबळे,भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आणि श्रीनाथ भिमाले यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
मंजुषा नागपुरे या प्रभाग क्रमांक ३५ मधून तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत, तर वर्षा तापकीर या चौथ्यांदा नगरसेवक झाल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत मंजुषा नागपुरे बिनविरोध निवडून आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने मनपा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्याशी युती केली होती. या युतीअंतर्गत आरपीआयला नऊ जागा देण्यात आल्या होत्या. संबंधित जागांवर आरपीआयचे उमेदवार कमळ चिन्हावर लढून विजयी झाले आहेत. यामध्ये पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांचे पती आणि आरपीआयचे ज्येष्ठ नेते परशुराम वाडेकर यांचे नाव उपमहापौर पदासाठी आघाडीवर होते. दरम्यान, भाजपने गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक गणेश बिडकर यांची निवड केली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी श्रीनाथ भिमाले यांचे नाव आघाडीवर आहे. यावेळी बोलताना भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, “नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला घवघवीत यश दिले आहे. या यशाच्या माध्यमातून नवनिर्वाचित सदस्यांना पुणेकरांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. पुण्याचे महापौरपदी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांना संधी देण्यात येत आहे.” गणेश बीडकर म्हणाले, “भाजपच्या तीन पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज पक्षाला शहरात यश मिळाले आहे. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम केले, ज्यामुळे आज पक्षाला सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.”

