महिलांसाठी महापौरपद आरक्षित नसताना ‘लाडक्या बहिणीं’कडे जबाबदारी; हा शिवसेनेचा विश्वासाचा निर्णय– डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. २ फेब्रुवारी २०२६ :
महिलांच्या सक्षमीकरणाबाबत शिवसेनेची भूमिका केवळ घोषणापुरती न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरलेली आहे, याचे ठळक उदाहरण म्हणजे ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये महिलांची महापौरपदी निवड. महिलांसाठी महापौरपद आरक्षित नसतानाही शिवसेनेने ‘लाडक्या बहिणीं’वर विश्वास दाखवत हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
ठाणे महापालिकेत शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, कल्याण-डोंबिवली महापालिकेत हर्षाली थविल चौधरी आणि उल्हासनगर महापालिकेत अश्विनी निकम यांची महापौरपदी वर्णी लागणार आहे. महापौरपदासाठी महिला आरक्षण नसतानाही शिवसेनेचे पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ राजकीय नसून महिलांच्या कर्तृत्वाला दिलेली दाद आहे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “महिलांनी शिवसेनेला भरभरून पाठिंबा दिला आहे. त्यांच्या कुवतीवर, नेतृत्वक्षमतेवर आणि कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत त्यांना संधी देणे, हीच खरी समानतेची भावना आहे. आरक्षणाची वाट न पाहता महिलांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्याचा शिवसेनेचा हा निर्णय प्रेरणादायी आहे.”
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापौरपदासाठी महिलांनाच प्राधान्य द्यावे, अशी आग्रही भूमिका मांडली होती आणि त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये प्रथमच महिलाराज प्रस्थापित होत आहे.
मुंबई महापालिकेतही शिवसेनेच्या महिलांचा वरचष्मा स्पष्टपणे दिसून येतो. शिवसेनेच्या २९ नगरसेवकांपैकी १९ महिला नगरसेविका आहेत. तसेच युतीअंतर्गत मिळालेल्या ९० जागांपैकी ६३ जागांवर शिवसेनेने महिला उमेदवार दिले होते, हे पक्षाच्या महिला-केंद्रित धोरणाचे द्योतक आहे.
नगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही शिवसेनेचे ६० नगराध्यक्ष निवडून आले असून त्यापैकी ३३ महिला आहेत. त्यामुळे महापालिका असोत वा नगरपालिका, सर्वच स्तरांवर ‘लाडक्या बहिणींचे’ नेतृत्व अधिक भक्कम होत आहे.
“महिला सक्षमीकरण हे शिवसेनेचे घोषवाक्य नसून सातत्यपूर्ण कृती आहे. भविष्यातही महिलांना नेतृत्वाच्या संधी देत शिवसेना त्यांचा सन्मान आणि विश्वास अधिक दृढ करेल,” असा विश्वास डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

