मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांची प्रतिक्रिया
मुंबई, १ फेब्रुवारी २०२६ – भारतीय अर्थव्यवस्था पुढील दोन-तीन वर्षांतच जगातील तिसरी मोठी अर्थसत्ता बनू शकेल. तशा संधीही आपल्याला चालून आल्या आहेत. ब्रिटन, न्यूझिलंड संयुक्त अरब अमिरात, युरोपीय महासंघ यांच्याशी झालेल्या व्यापारी करारांमुळे निर्यातवाढीत मोठी झेप अपेक्षित आहे. मात्र त्याचवेळी अनिवासी भारतीयांकडून भारतात गुंतवणुकीला प्रोत्साहनाबाबत, तसेच भारतातील रीटेल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याबाबत ताज्या अर्थसंकल्पात ठोस उपाय हवे होते, अशी अपेक्षा अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्सचे अध्यक्ष व मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी बोलून दाखवली आहे.
आज जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करताना ते म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड ताकद देण्याचे सुप्त सामर्थ्य रीटेल क्षेत्रात आहे, परंतु भारतात एकतर या क्षेत्रात खूप कमी व्यावसायिक आहेत आणि जे आहेत ते उच्च करांच्या दडपणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सक्षमतेने स्पर्धा करु शकत नाहीत. त्यावर उपाय म्हणून सरकारने हे व्यावसायिक व सर्वसामान्यांवरील करांचे ओझे कमी करावे आणि अनिवासी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायांना भारतातील रीटेल क्षेत्रात थेट गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन द्यावे.”
ते पुढे म्हणाले, “भारतातील प्रचंड लोकसंख्येच्या तुलनेत तसेच रीटेल बाजारपेठही प्रचंड उलाढालीची असताना या क्षेत्रात व्यावसायिकांची संख्या अद्यापही पुरेशी नाही. त्यामुळे भारतीय परदेशात जाऊन व्यवसाय करतात पण देशात मात्र मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत नाही परदेशांच्या तुलनेत स्थानिक वेतनमानही आकर्षक नसते. यावर उपाय म्हणून सरकारने अनिवासी भारतीय व आंतरराष्ट्रीय व्यवसायांना भारतीय रीटेल क्षेत्रात आकर्षित करुन कर सवलती दिल्यास तसेच परकी थेट गुंतवणुकीस (एफडीआय) प्रोत्साहन दिल्यास येथे नव्या नोकऱ्या आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, कर्मचाऱ्यांना चांगले वेतनही मिळेल आणि व्यावसायिकांची संख्या वाढल्यास स्पर्धात्मकतेमुळे वस्तूंच्या किंमती कमी होऊन सर्वसामान्यांना वस्तू स्वस्तात मिळतील. अनेक अनिवासी भारतीय जगभरात उत्तम व्यवसाय करतात, पण भारतात गुंतवणुकीस राजी होत नाहीत. हे चित्र बदलणे गरजेचे आहे.”
भारतातील रीटेल क्षेत्रात प्रचंड सुप्त सामर्थ्य आहे आणि आगामी काळ भारतासाठी अत्यंत आश्वासक आहे, असे स्पष्ट करताना डॉ. दातार म्हणाले, की काही वर्षांपूर्वी भारत खरेदीदारांची बाजारपेठ (बायर्स मार्केट) होता तो आज विक्रेत्यांची बाजारपेठ (सेलर्स मार्केट) बनला आहे. जगातील अनेक देश भारतीय अन्नधान्य, कृषी व अन्य उत्पादने तसेच सेवांकडे डोळे लावून बसले आहेत. माझी कंपनी आखाती देशांच्या बाजारपेठांमध्ये रीटेल क्षेत्रात कार्यरत आहे आणि माझ्या कंपनीला वर्षानुवर्षे उत्तम निर्यातवाढ मिळत आहे. भारतीय उत्पादनांना बाहेरच्या देशांत किती मोठी मागणी आहे, याचे हे एक छोटेसे उदाहरण आहे. आपण या बाजारपेठेची परिसंस्था (इकोसिस्टिम) परिपूर्ण विकसित करु शकलो तर त्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्था उद्दिष्टापेक्षा फार लवकर आर्थिक महासत्ता बनण्यात होईल.”

