साहित्यदीप काव्य महोत्सवात कलादीप पुरस्काराने गुरू ठाकूर यांचा गौरव
पुणे : मी काही ठरवून प्रवासाला निघालोच नाही. जे अवगत आहे, त्यातच न रमता, तोचतोचपणा टाळून, नव्या वाटा शोधायला आणि त्यावरून चालायला मला आवडते. आता दिग्दर्शनाची वाट चालायला सुरवात केली आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार गुरू ठाकूर यांनी केले. शब्दांवर प्रेम करणारा संगीतकार आणि सुरांवर प्रेम करणारा गीतकार असेल, तर रसिकत्व जागे करणारे गीत नक्की जन्माला येते, असेही ते म्हणाले.
साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित दोन दिवसीय काव्य महोत्सवात (दि. ३१) गुरू ठाकूर यांचा कलादीप पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण काव्य महोत्सवाच्या अध्यक्षा डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या हस्ते झाले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, मुलाखतकार डॉ. पंडित संदीप अवचट उपस्थित होते. त्यानंतर गुरू ठाकूर यांच्याशी डॉ. संदीप अवचट यांनी संवाद साधला. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरू ठाकूर म्हणाले, लहानपणापासून घरातल्या वडिलधाऱ्यांचे संस्कार, संतसाहित्याचे वाचन आणि माझी वाचनाची आवड, यातून मी शब्दांकडे ओढला गेलो. माझी पहिली आवड चित्रकलेची. मी राजकीय अर्कचित्रे रेखाटत असे. सोबत त्या चित्रांना साजेसे भाष्यही करत असे. ते भाष्य आवडल्याने दिलीप प्रभावळकर, शं. ना. नवरे अशा मान्यवरांची दाद मिळाली आणि त्यातूनच सदर लेखन आणि मग मालिका लेखनाची सुरवात झाली. हसा चकटफु, गंगाधर टिपरे अशा अनेक मालिकांना उत्तम प्रतिसाद मिळाला. मग चित्रपटलेखन, संवादलेखन आणि शेवटी गीतलेखन असा प्रवास सुरू झाला.
मला आयुष्यात तोचतोचपणा फार कंटाळवाणा वाटतो. जोपर्यंत आनंद वाटतो, तोपर्यंतच मी एखादी गोष्ट करतो. त्यामुळेच नटरंग नंतर तब्बल १२ वर्षे पुन्हा लावणी लिहिली नाही. माझ्यातील या वृत्तीमुळेच मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणण्याची श्रीमंती टिकवून ठेवली आहे, असे सांगून गुरू ठाकूर म्हणाले, कविता स्वयंस्फूर्त असते, तर गाणे घडीव असते. गाण्यात मला परकायाप्रवेश करायचा असतो. कवितेत मी स्वतःपुरता व्यक्त होऊ शकतो. गाण्यात मला वेगवेगळी रूपे धारण करता येतात, त्यामुळे मला गीतलेखन अधिक आव्हानात्मक वाटते. कविता माझ्यासाठी, माझ्यापुरती असू शकते पण गाणे हे टीमवर्क असते. गीतलेखन करताना ॲक्टरपेक्षा कॅरेक्टर महत्त्वाचे असते. ती व्यक्तिरेखा कोणत्या प्रांतातील आहे, कोणत्या बोलीत संवाद साधणारी आहे, शिक्षण किती आहे असे अनेक मुद्दे लक्षात घेत गीत लिहिण्याचे आव्हान असते. नव्याने लिहिणाऱ्यांचे वाचन आणि अभ्यास कमी पडत असावा. त्या तुलनेत बुजुर्ग मंडळींचा आदर्श जरूर घ्यावा, असे निरीक्षणही गुरू ठाकूर यांनी नोंदवले. गाणे गीतकाराचे, संगीतकाराचे, गायकाचे असते, पण शेवटी ते रसिकांचे होऊन जाते. गीतकाराने पाण्यासारखे असावे, पात्रानुरूप आकार धारण करावा, असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन, सन्मानपत्राचे लेखन आणि वाचन धनंजय तडवळकर यांनी केले.
गझलकार भूषण कटककर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित गझल मुशायरा या कार्यक्रमात प्रमोद खराडे, शिवदादा डोईजोडे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, श्याम खामकर, डॉ. माधुरी चव्हाण-जोशी, तेजस भातकुलकर, प्राजक्ता पटवर्धन, मीना शिंदे, राहुल कुलकर्णी, किरण वेताळ, वैशाली माळी, वैजयंती आपटे यांचा सहभाग होता. त्यानंर बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ‘किलबिल किलबिल’ हा बाल कविता व गीतांचा कार्यक्रम प्रांजली बर्वे व सहकलाकारांनी सादर केला. प्राजक्ता वेदपाठक यांनी सूत्रसंचालन केले.

