उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करून संशयाचे ढग दूर करा.
मुंबई, धाराशिव, दि. ३० जानेवारी २०२६
राज्यात व केंद्रात १९९९ नंतर आघाडीचे राजकारण सुरु झालेले आहे. आघाडीच्या राजकारणात दोन पावलं मागे घ्यावी लागतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. जेथे शक्य आहे तेथे आघाडी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना दिले होते. नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी धाराशिवच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते, ते पुढे म्हणाले की,
एकीकडे भाजपा व एमआयएम धार्मिक द्वेष पसरवत आहेत तर दुसरीकडे निवडणूक आयोग, पैसा, हिंदु , प्रशासकीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आला. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या हातातील कठपुतली बाहुली बनलेलेही राज्याने पाहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लोकशाही पायमल्ली करण्यात आली. या परिस्थितीत आम्ही वंचित बहुजन आघाडी, रासप, ओबीसी बहुजन आघाडी हे नवे मित्र पक्ष जोडले आहेत. कार्यकर्त्यांना संधी दिली व जनतेने मोठा विश्वास दाखवत काँग्रेसला राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले. नगरपालिकेत ४१ नगराध्यक्ष १००६ नगरसेवक तर महानगरपालिकेत ३५० नगरसेवर निवडून दिले, तीन महानगरपालिकेत काँग्रेसच पक्षाचे महापौर होत आहेत असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
अजित पवारांच्या अपघाती निधनाची सखोल चौकशी व्हावी..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या लोकनेत्याचे अकाली निधन मनाला चटका लावून गेले. विमान अपघातात झालेल्या निधनाने संशयाचे ढग निर्माण झाले आहेत, या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. जर संशय व्यक्त केला जात असेल तर सखोल चौकशी करून संशय दूर झाला पाहिजे.
यावेळी उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार व प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते धीरज देशमुख, धारश्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

