मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईहून बारामतीच्या विमानतळावर लँड करत असतानाच त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह विमानातील सर्वांचाच मृत्यू झाला आहे. आता हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता याची चौकशी एएआयबी या संस्थेने सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.
विमान अपघात तपास ब्यूरो (AAIB) या संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल आल्यानंतर तो राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करावी असे पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी म्हटले की, विमान अपघात ब्यूरो या संस्थेने तपास सुरू केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार, तपास सुरू केला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल.
चौकशीचा अहवाल राज्य सरकारलाही देणार
तसेच पुढे बोलताना किंजरापु राममोहन नायडू म्हणाले, या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून, चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल. स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ, अशी माहिती नायडू यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्रात असे म्हटले की, अजित पवार यांच्यासारख्या अतिशय वरिष्ठ नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासह आणखी 4 जणांना यात प्राण गमवावे लागले. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच भविष्यात असे अपघात घडणार नाहीत या दृष्टीने तातडीने पाऊले उचलण्यात यावी, अशी देखील मागणी फडणवीसांनी पत्रातून केली होती.

