मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर AIMIM च्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या ‘मुंब्रा हरा कर देंगे’ विधानाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पाठिंबा दिला. “येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू,” असे विधान जलील यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात ठिणगी पडली आहे. जलील यांच्या या चॅलेंजला भाजप आमदार आणि राज्याचे मंत्री नीतेश राणे यांनी अत्यंत तिखट आणि जहरी शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्र हिरवा करू’ म्हणणाऱ्या हिरव्या सापाला जमिनीत गाडू, असा इशारा नीतेश राणे यांनी इम्तियाज जलील यांना दिला.
मुंब्र्यातील एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी निवडणुकीनंतर एक वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचा बचाव करताना माजी खासदार इम्तियाज जलील यांनी, “सहर शेख यांचे विधान हे केवळ त्यांचे वैयक्तिक मत नसून पक्षाचे अधिकृत मत आहे,” असे सांगत संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करण्याचा संकल्प बोलून दाखवला होता. जलील यांच्या याच ‘हिरव्या’ विधानाचा नीतेश राणे यांनी समाचार घेतला आहे.
मीडियाशी संवाद साधताना नीतेश राणे यांनी इम्तियाज जलील यांचा उल्लेख ‘हिरवा साप’ असा करत जोरदार प्रहार केला. “हा हिरवा साप कदाचित आपला इतिहास विसरला असावा. औरंगजेब आणि टिपू सुलताननेही महाराष्ट्राला ‘हिरवे’ करण्याचे स्वप्न पाहिले होते. पण त्यांना याच भूमीत गाडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी भगवा फडकवत इतिहास घडवला आहे,” अशा शब्दांत राणेंनी जलील यांची कानउघाडणी केली.
नीतेश राणे यांनी यावेळी हिंदू राष्ट्राचा पुनरुच्चार करत आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, “हे हिंदू राष्ट्र आहे आणि हे कायम भगवेच राहणार, हे जितक्या लवकर हे लोक समजून घेतील तितकं त्यांच्यासाठी चांगलं आहे. जो कोणी या हिंदू राष्ट्राला हरवण्याचे स्वप्न पाहील, त्याला महाराष्ट्रातील हिंदू औरंगजेबाच्या कबरमध्ये पुरल्याशिवाय राहणार नाहीत.” राणेंच्या या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एमआयएम आता यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

