पुणे- सुप्रसिद्ध मराठी लेखिका सौ. शुभदा गोगटे यांचे शनिवारी, २४ तारखेला, पहाटे २:४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केले होते.त्यांच्या मागे पती, शरद गोगटे, दोन कन्या, जावई, नातू, असा परिवार आहे.
त्यांनी लेखनाची सुरुवात विज्ञान काल्पनिकतेने केली. त्यांची पहिलीच वैद्यानिक कादंबरी, ‘यंत्रायणी’ हिला १९८३ सालाचा महाराष्ट्र सरकारचा साहित्य पुरस्कार मिळाला. त्यांच्या बऱ्याच विज्ञान आणि गूढ कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.साहित्य अकादमी आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास यांनी प्रसिद्ध केलेल्या भारतीय वैद्यानीक कथांच्या प्रातिनिधिक संग्रहांत त्यांच्या विज्ञान कथांचा समावेश आहे.शुभदा गोगटे यांच्या भारतातील रेल्वे इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ आणि ‘सांधा बदलताना’ या दोन कादंबऱ्या बऱ्याच गाजल्या.‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह. ना. आपटे पुरस्कार तसेच गो. नी. दांडेकरांचा मृण्मयी पुरस्कार मिळाला.याशिवाय त्यांचं डॉ. जगदीश हिरेमठांच्या ‘रिव्हरसिंग द हॉर्ट डिसीज’ या कार्यक्रमावर आधारित ‘हृदयविकार निवारण’ हे उपयुक्त पुस्तक अतिशय लोकप्रिय झाले. त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या.त्यांची प्रतिभा बहुआयामी होती. १९८० च्या दशकात त्यांनी अनेक प्रयोग करून इन्स्टंट फुड्स तयार केली होती.

