अमराठी मतदार एकवटले, मराठी मतदार विभागले; भाजपने मते मिळवली, ठाकरे बंधूंनी मने जिंकली
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत इतिहास घडला. पहिल्यांदाच भाजपला प्रचंड यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीतील शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत भाजप २९ पैकी २५ महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करत आहे. भाजप-शिंदेसेनेच्या युतीने मुंबईत इतिहास घडवला. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभराचे लक्ष मुंबई महापालिकेकडे लागले होते. मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन उद्धव-राज ठाकरे २० वर्षांनंतर एकत्र आले होते. येथे बहुमतासाठी ११४ जागांची गरज आहे. शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर निकालानुसार २२७ पैकी ११८ वॉर्डांत महायुतीने विजय मिळवला होता. त्यात भाजपने ८९ तर शिंदेसेनेने २९ जागा पटकावल्या. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकवटली होती. पण भाजपने दोन्ही ठिकाणी एकहाती बहुमत मिळवले. नाशिक, सोलापूरमध्ये स्वबळावर लढणाऱ्या भाजपने एकहाती यश मिळवले. संभाजीनगरात भाजपने प्रथमच एकहाती सत्ता काबिज केली आहे.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाऐवजी मराठी अस्मितेचा मुद्दा घेतला. त्यासाठी २० वर्षांनंतर राज ठाकरेंना सोबत घेतले. यामुळे अमराठी मतदार ठाकरे बंधूंविरोधात एकवटले. दुसरीकडे ज्या मराठी मतदारांची मते एकगठ्ठा मिळतील अशी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही. मराठी माणसाने भाजप-शिंदेसेना, ठाकरे बंधूंना मतदान केले. भाजपने २०१७ तसेच २०२४ लोकसभा, विधानसभेचे मतदान लक्षात घेऊन बूथवर भर दिला. शिंदेसेनेला सोबत घेऊन अजित पवारांना स्वतंत्र लढण्यास सांगितल्याने काही मुस्लिम मते फुटली. राज ठाकरेंमुळे काँग्रेसची उद्धवसेनेला साथ मिळणार नाही, अशीही व्यवस्था केली. मुंबई मनपाचे दरवर्षी सुमारे ७५ हजार कोटींचे बजेट भाजपच्या हाती असेल.कोस्टल रोड, मेट्रो जाळ्याचा
मुंबईतील कोस्टल रोड, मेट्रोचे जाळे आणि सिमेंटचे रस्ते या विकासकामांचा प्रभाव शहरी मतदारांवर दिसून आला. भाजपने ‘डबल इंजिन’ सरकारचा फायदा घेत विकासाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला, ज्याला मुंबईकरांनी पसंती दिली.
गुजराती, उत्तर व दक्षिण भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर भाजपला कौल दिला. मुलुंड, कांदिवली, बोरिवलीत भाजपची पकड अधिक घट्ट होऊन ठाकरेंचे मराठी मतांवरील वर्चस्व सत्ता मिळवण्यासाठी अपुरे पडले.
महाराष्ट्रातील जनतेने प्रगतीला गती देणारा कौल दिला. उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत!

