पुणे, : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती, कमला नेहरू रुग्णालय परिसर) मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणेश बिडकर यांच्यासह पॅनल मधील उमेदवारांनी आपले संकल्पपत्र जाहीर केले आहे. या संकल्पपत्रात प्रभागातील नागरिकांच्या प्रमुख समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला असून, वाहतूक नियोजन, आरोग्यसुविधा, पाणीप्रवाह व्यवस्था, सुरक्षा आणि प्राचीन वारसा जतन यांसारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे.
या संकल्प बाबत बोलताना बिडकर म्हणाले,शहराच्या मोठ्या प्रकल्पांसोबतच प्रभाग पातळीवरही ठोस विकास साध्य करण्याचा निर्धार आहे. संकल्पपत्रात ‘संविधान सन्मान अभ्यासिका’ सुरू करण्याचा विशेष निश्चय आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होऊ शकतील. तसेच या संकल्पपत्रामध्ये कमला नेहरू रुग्णालयातील आरोग्यसुविधा बळकट करण्यावर भर दिला आहे.
वाहतुकीच्या समस्येवर बोलताना बिडकर म्हणाले, मेट्रोच्या विस्तारीकरणामुळे प्रभागातील नागरिकांना शहरभर आरामदायी प्रवास शक्य होईल. इलेक्ट्रिक बस आणि पुण्यदर्शन सेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा संकल्प आहे. पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येसाठी नाल्यांना सीमाभिंती बांधणे, कल्व्हर्ट सुधारणा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जातील.
प्रभाग मूळ शहराचा भाग असल्याने रस्ते रुंदीकरणाला मर्यादा आहेत. त्यामुळे पार्किंग आणि गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करणार असल्याचे बिडकर यांनी सांगितले. प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि पेट्रोलिंग वाढवले जाईल. तसेच प्राचीन वारसास्थळांचे जतन व संवर्धन हा महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल असं बिडकर म्हणाले.
दिलेला शब्द पाळणे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवणे हा आमचा कर्तव्याचा भाग आहे. शहरातील मेट्रो, नदीकाठ सुधारणा, २४ तास पाणीपुरवठा यांसारख्या प्रकल्पांचा थेट लाभ प्रभागातील नागरिकांना मिळेल. असा विश्वास बिडकर यांनी व्यक्त केला आहे.
बिडकरांकडून संकल्प पत्रामध्ये जाहीर करण्यात आलेल्या संविधान सन्मान अभ्यासिकेच्या संकल्पनेबाबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आनंद व्यक्त केला असून या संकल्पनेचा कौतुक देखील केला आहे.
तसेच महायुतीच्या चारही उमेदवारांना निवडून द्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकारण्यासाठी, पुण्याच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. महायुती ही आपलीच आहे.” असे आवाहन आठवले यांनी भीमनगर आणि मंगळवार पेठेतील जनतेला केला आहे.

