एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन’ उत्साहात साजरा
सेवा, धैर्य आणि वचनबद्धतेला सर्मपित पुणे पोलिस
९९.९९ टक्के पोलिस प्रामाणिक : अमितेश कुमार
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की पोलिस दलातील ९९.९९ टक्के पोलिस प्रामाणिक आहेत. आज पुणे येथे ११ हजार पोलिस अधिकारी जवळपास ६०० स्क्वेअर किमी पर्यंत, ३६५ दिवस २४ तास लोकांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असतात. कायद्याच्या चौकटीत राहून ते प्रामाणिक कार्य करतात. जनतेच्या तक्रारींसाठी उपलब्ध केलेल्या १२२ नंबर लगेच उपलब्ध राहून सेवा देत आहेत.
पुणे, दि. ८ जानेवारी : “विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांचे सेवन, व्यसन व वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. फ्रेशर्स पार्टी पासून दूर राहून करियर घडवा. युवती व महिलांनी लक्ष्मण रेखा समजून घ्या. पोलिसांना कोणाचेही करियर बरबाद करायचे नसते परंतू ड्रग्स आणि अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात १०० पैकी ५ जरी पकडले गेले तर ते संपले समझा.” असा कडक इशारा पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच नवयुवकांना आवाहन केले की असा व्यवसाय करणार्यांची माहिती देणार्यांची संपूर्ण गोपनियता पुणे पोलिस ठेवेल.
सेवा, धैर्य आणि वचनबद्धतेला सर्मपित असणारे ‘महाराष्ट्र पोलिस स्थापन दिना’ निमित्त कोथरुड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उप-आयुक्त निखिल पिंगळे, डीसीपी संभाजी कदम हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर आणि डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. गणेश पोकळे उपस्थित होते.
एमआयटी डब्ल्यूपीयू येथे आयोजित हा कार्यक्रम शहरातील जवळपास १ हजार पेक्षा अधिक शाळा, महाविद्यालय व कॉलेज मधील जवळपास ५ लाख विद्यार्थी जोडले गेेले होते.
एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक-अध्यक्ष, विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अमितेश कुमार म्हणाले,” शहर सुरक्षेसाठी पोलिस आणि नागरिकांची पार्टनरशीप अत्यंत महत्वाची आहे. विशेषतः युवकांची कारण ते भारताचे भविष्य आहेत. त्यांचे चरित्र उत्तम असून जीवनाला शिस्त असल्यास गुन्हेगारी घडणार नाही. परंतू ते ड्रग्स, गांजा, दारू इतर मादक पदार्थांचे सेवन या सारख्या व्यसनात स्वतःला अडकवून कुटुंबाचे नुकसान करताना दिसतात.”
“देशातील सर्वात सुरक्षित शहर पुण्यात महिलांनी स्वतःची लक्ष्मण रेषा आखून घ्यावी. सोशल मिडिया पासून सांभाळल्यास ९० टक्के समस्या सुटतील. तरी पण घटना घडल्यास पोलिसांना तत्काळ सुचित करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑनलाइन गेमिंग, ईमेल फसवणूक आणि सोशल नेटवर्क प्रोफाइलशी छेडछाड, ऑनलाइन फसवणूक, रहदारी पासून स्वतःचे संरक्षण करावे.
सायबर सुरक्षेसाठी सर्वांनीच पासवर्ड आणि बँकिंग चॅनल पासून सांभाळ करावा.”
रंजनकुमार शर्मा म्हणाले,” नशेच्या आहारी जाणारा युवा वर्ग हा शेवटी आत्महत्या पर्यंत पोहचत आहे. तसेच सायबर गुन्हे, नार्को, आर्थिक फसवणूक, वाहतूक समस्या आणि कायद्यांचे पालन न करणार्या घटना वाढत आहेत. शहरात वयोवृद्धांना केंद्रित करुन त्यांना डिजिटल अरेस्ट करुन पैशांची मागणी होताना दिसत आहेत. अशा वेळेस गुन्हेगारीला अंकुश लावण्यासाठी नागरिकांनी ११२ या नंबर वर संपर्क साधावा.”
त्यानंतर पंकज देशमुख व निखिल पिंगळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, तत्काळ सेवा आणि सुचनेचे पालन करण्याची जबाबदारी पेलत पोलिस विभाग शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राथमिकता देतो. शहरातील ५ लाख विद्यार्थी हा कार्यक्रम पाहत असताना ते देश सेवा आणि पुणे शहराच्या सुरक्षे प्रती नक्कीच जागरूक होतील.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण करताना देशात वाढत्या आर्थीक गुन्हेगारी, सायबर सोशल मिडिया, फेक न्यूज, सायबर क्राइम यावर भाष्य केले.
डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रसाद खांडेकर यांनी आभार मानले.

