60-65 नगरसेवक बिनविरोध कसे निवडून येतात?:संजय राऊतांचा थेट सवाल

Date:

मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काय म्हणून यांचं कर्तृत्व की त्यांना बिनविरोध निवडून दिलं जातंय? असा थेट सवाल करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर संशयाची छाया टाकली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडी होणं हे लोकशाहीसाठी धोकादायक असून, यामागे दबाव, भीती आणि गैरप्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.संजय राऊत म्हणाले, 60 ते 65 उमेदवार बिनविरोध कसे काय निवडून येतात? हे कोणत्या विकासकामांच्या, कोणत्या लोकहिताच्या कर्तृत्वावर? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपच्या सत्ताकाळातील कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. बिनविरोध निवडी ही लोकशाहीची हत्या असून, मतदारांचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

निवडणूक आयोगावरही राऊतांनी सडकून टीका केली. निवडणूक आयोग म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आयोगाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. बिनविरोध निवडींची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा लोकशाहीवरील विश्वास उडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

देशातील आणि जगातील लोकशाही इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची उदाहरणे नसल्याचे सांगत राऊत यांनी याला लोकशाहीसाठी धोकादायक प्रवृत्ती ठरवले. अटल बिहारी वाजपेयी, बॅरिस्टर नाथ पै, वसंतदादा पाटील, राम मनोहर लोहिया किंवा आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कधी बिनविरोध निवडून आले नाहीत. मग महाराष्ट्रात एवढे लोक कोणत्या कर्तृत्वावर बिनविरोध निवडून येत आहेत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात बिनविरोध निवडींसाठी ‘साम, दाम, दंड, भेद’ या सगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत. समोरच्या उमेदवारांवर दबाव टाकणे, धमक्या देणे आणि प्रचंड आर्थिक आमिष दाखवणे हा एक नवीन राजकीय ट्रेंड तयार झाला आहे. देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात इतक्या संख्येने बिनविरोध निवडी कधी झाल्या नव्हत्या. हे आकडे पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि सामान्य जनतेला देखील हादरवणारे आहेत, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात लोकशाही प्रक्रिया जाणीवपूर्वक मोडीत काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

बिनविरोध माघारीसाठी वापरल्या जाणाऱ्या पैशांच्या खेळावर बोलताना राऊतांनी गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यासाठी पाच-पाच कोटी रुपयांच्या ऑफर दिल्या गेल्याची चर्चा आहे. कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख मनोज घरत यांना माघार घेण्यासाठी देण्यात आलेला आकडा पाहून डोळ्याची बुबुळ बाहेर पडेल, असे राऊत म्हणाले. जळगावमध्ये तर उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून घराघरांत कोट्यवधी रुपयांच्या बॅगा पोहोचवल्याचा आरोप त्यांनी केला. इतका प्रचंड पैशांचा खेळ या देशाच्या लोकशाहीत कधीच झाला नव्हता, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.

बिनविरोध निवडीसाठी निवडणूक यंत्रणेचाच गैरवापर

निवडणूक यंत्रणेच्या भूमिकेवरही संजय राऊत यांनी कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, बिनविरोध निवडीसाठी निवडणूक यंत्रणेचाच गैरवापर करण्यात आला. माघारीसाठी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ असतानाही, त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तीन वाजल्यानंतरही अर्ज घ्या आणि तीन वाजण्याआधीची वेळ दाखवा, अशा स्पष्ट सूचना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या, असा दावा राऊत यांनी केला. या सगळ्या प्रकरणात कोणकोणाचे फोन आले, कोणत्या मंत्र्यांचे आणि कोणत्या कार्यालयातून दबाव टाकला गेला, याची चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकारामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप करत राऊत म्हणाले की, राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. जर 60-60 उमेदवार बिनविरोध होत असतील, तर ही निवडणूक कसली? मग मतदारांनी करायचं काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एखाद्या भागातील उमेदवार दबावाखाली किंवा पैशांसाठी माघार घेत असतील, तर त्या भागातील मतदारांचे हक्क हिरावले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाला या सगळ्याचं काहीच वाटत नाही का, असा सवाल करत त्यांनी आयोगावरही टीकेची झोड उठवली.

निवडणूक आयोग हा भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर

निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका करत संजय राऊत म्हणाले की, आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुलं बनत चालला आहे. निवडणूक आयोग हा भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे. हे पाळीव मांजर बनलं आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. लोकशाही टिकवायची असेल तर या बिनविरोध निवडींची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रात निवडणुकांचा अर्थच उरणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.

अजित पवारांनी शरद पवारांसोबत परत यावे

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलताना राऊत म्हणाले, हा आरोप आम्ही केलेला नाही, असं स्पष्ट करत त्यांनी भाजपवरच अप्रत्यक्ष बोट दाखवलं. सत्तेसाठी सगळे आरोप विसरून एकत्र बसणं हे राजकीय ढोंग असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. आज अजित पवार भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. मग त्यांनी अमित शहांनी दिलेला पक्ष सोडून मुळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत यावे, असा खोचक सल्ला देखील त्यांनी दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 सत्ताशरण समाज ही आपली ओळख बनत चालली- गिरीश कुबेर

स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) आपण समाज म्हणून गुणवत्तेला मान द्यायला शिकलो नाही. सत्ताशरण समाज ही आपली ओळख बनत चालली आहे. आपण बुद्धिवंतांचा आदर करत नाही. सत्ता हेच आपल्याला सौंदर्य वाटू लागले आहे. हे महाराष्ट्रासाठी जास्त धोकादायक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज (दि. ४) आयोजित विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. किशोर बेडकीहाळ आणि प्रसन्न जोशी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कुबेर म्हणाले, आज प्रसार माध्यमांना उत्तरदायित्व उरलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. काही वृत्तपत्रांचे मालक हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे ते विशिष्ट बाजू घेऊन पत्रकारिता करतात. परंतु त्यामुळे समग्र माध्यमांवर अप्रामाणिकपणाचा आरोप केला जातो. त्यातून पत्रकारिता सरसकट बदनाम होत राहते. वास्तुत: शरणता न दाखवणे हे माध्यमांचे हे प्रमुख कर्तव्य आहे. माध्यमांनी आपले काम चोखपणाने करणे अपेक्षित आहे.मूर्तीभंजन करणे हेच माध्यमांचे प्रमुख कर्तव्य आहे. ते माध्यमकर्मींनी चोखपणे करणे गरजेचे आहे. ते त्यांनी केले नाही तर त्यांची गरजच उरणार नाही. आजच्या साहित्य विश्वावर भाष्य करताना ते म्हणाले, आजही मोठा वाचकवर्ग पुलंच्या पुढे गेलेला नाही. माध्यमांनी निवडक वर्गाला प्राधान्य दिले आहे. भूमिका न घेणे हे सडू लागलेल्या समाजाचे लक्षण आहे.

राज्यात झुंडशाही सुरु, लोकशाही संपली:दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचे निलंबन करा; उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई-निवडणुका बिनविरोध करण्यासाठी कशाप्रकारे धमक्या दिल्या जात आहेत, कशाप्रकारे...

पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप, महाराष्ट्रात का नाही? राज ठाकरेंचा सवाल

मुंबई-पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडीविरोधात आक्षेप घेतला, मग आता महाराष्ट्रात...

आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला महायुतीने सोडली अवघी एकच जागा, 13 वॉर्डांत स्वबळावर

मुंबई: महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)...