पुणे- जैन समाजाच्या जागेवरून भाजपा चे पुण्यातील नेते विरुद्ध एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर असे चित्र काही काळ पुण्याला पाहायला मिळाले असले तरी जैन समाजाची जागा त्यांना परत मिळवून देण्यात आली आता त्यांनी कोणाच्या पाठीशी उभे राहायचे याचे सर्वाधिकार लोकशाही मार्गाने त्यांनाच आहेत असे धंगेकर यांनी आज येथे म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीने पुणे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना ११ आणि बारा डिसेंबर रोजी विनामुल्य अर्ज वाटप करण्यास आज प्रारंभ झाला , उमेदवारी अर्ज १४ आणि १५ डिसेंबर रोजी स्वीकारण्यात येणार आहे. या वेळी पुण्यातील नेते रवींद्र धंगेकर बोलत होते .
धंगेकर म्हणाले,’ महाराष्ट्रात दिर्घकाळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच संपन्न होत आहेत. नगरपरिषद व पंचायत यांच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद व महानगरपालिका यांच्याही निवडणुका होत आहेत. आपली पुणे महानगरपालिकेची निवडणुकही आता संपन्न होणार आहे. आपल्या शहराचे भवितव्य ठरविणारी ही निवडणूक असल्यामुळेच त्याबाबत अधिक विचारपूर्वक पाऊले टाकणे मी महत्त्वाचे मानतो.
यामध्ये तरुणांवर माझा मोठा भर राहणार आहे. कारण आपले पुणे हे देशातील सर्वात ‘तरुण शहर’ मानले जाते. एका अंदाजानुसार पुण्याच्या लोकसंख्येत ३५ वर्षांखालील तरुणांची संख्या तब्बल ६२% आहे. त्यामुळेच या तरुणांच्या हाती आपल्या पुण्याचा कारभार सोपवणे हीच योग्य नीती मानली पाहिजे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रात लाखो तरुणांना नवचैतन्य दिले आणि तरुणांच्या हाती सता देऊन महाराष्ट्र धर्म वाढवला. हीच प्रेरणा घेऊन उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे यांनीदेखील तरुणाईवर पूर्ण विश्वास टाकून तरुणांनी सक्रीय राजकारणात येण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले.
शहरच्या विकासाचे नियोजन करून नागरिकांना अधिक विकसित शहर देण्याची जबाबदारी ही नवनिर्वाचित तरुण नगरसेवकांवर असणार आहे. त्यासाठीच शिवसेना पक्षाने ‘तरुण कार्यकर्ता’ हा केंद्रबिंदू मानून महानगरपालिकेच्या या निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही काळात झालेल्या नगरपरिषद व पंचायत निवडणुकांमध्ये प्रचंड उत्साह दिसला खरा मात्र वारेमाप पैशाचा झालेला धुराळा देखील दिसून आला. उच्चपदस्थ नेत्यांनी नातेवाईकांमध्येच उमेदवारी दिल्याचे दिसून आले. लोकशाहीला मारत असणाऱ्या बाबींमुळे पक्षाचा कणा असणारा ‘तरुण कार्यकर्ता’ मात्र हरवत चलला आहे याची जाणीव प्रकर्षाने होत राहिली.
त्यामुळेच शिवसेना पक्षाने हरवत चाललेल्या तरुण कार्यकर्त्यास बळ देऊन या निवडणुकीत उमेदवारी देऊन निवडून आणण्याचा विडा उचलला आहे. दीर्घकाळ महानगरपालिकेत निवडून येऊन सताकारण
करणारे अनेक ज्येष्ठ नगरसेवक या निवडणुकीतही पुन्हा उभे राहिले तर तरुण कार्यकर्त्याला संधी तरी कधी मिळणार? हा प्रश्न असंख्य तरुण कार्यकर्त्यांना भेडसावत आहे. त्यामुळेच जनतेचा सेवक म्हणून काम करण्याची उर्मी असणारा आणि प्रभाग आणि शहराच्या विकासाबाबत ठोस समज असणारा तरुण कार्यकर्ताच शहराच्या विकासाला योग्य दिशा देईल, वेग देईल आणि भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी कारभार करून नागरिकांच्या हिताचे संरक्षण करेल. अशा तरुण कार्यकर्त्यांनाच या निवडणुकीत उमेदवारी देऊन निवडून आणण्याची शर्थ शिवसेना पक्ष प्राधान्याने करणार आहे.
अर्थात तरुण कार्यकर्ता अतिशय कर्तुत्त्ववान असला, जनतेत मिसळून काम करणारा असला तरी सध्याचे निवडणुकीतील भरमसाठ पैसे वाटप, दादागिरी व गुंडगिरी आणि जातीचे घातक राजकारण यांच्याशी टक्कर देण्याची हिम्मतही शिवसेना त्याच्यात निर्माण करीत आहे. त्यात निश्चित यश येईल हा मला विश्वास आहे. पुणेकर नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि प्रभाग व शहराचा विकास सखोल पद्धतीने करून घेणे हेच जीवनध्येय मानणारे तरुण कार्यकर्ते ‘विकासदूत’ म्हणून कार्य करीत राहतील आणि त्यामुळेच सध्याच्या घसरलेल्या राजकीय परिस्थितीत हरवत चाललेला तरुण कार्यकर्ता पुन्हा ताठ मानेने उभा राहिलेला दिसेल असा मला विश्वास आहे.
यासाठी मात्र जनतेची साथ सर्वात मोलाची असणार आहे. पैसा, गुंडगिरी आणि जातपात व धर्मभेद यांच्या दबावाला बळी पडून शहराचा विकास खुंटण्यास नागरिकांनी आपला हातभार लाभणार नाही असा निर्धार केला तर हे चांगले परिवर्तन निश्चित होऊ शकेल. हरवत चालेला तरुण कार्यकर्ता ताकदीने उभा करण्याची जबाबदारी आता नागरिकांचीच असणार आहे. त्यासाठी शिवसेना पक्ष तरुण कार्यकर्त्यांना या निवडणुकीत मोठी जबाबदारी देईल, उमेदवारी देईल. त्यांना पुणेकर नागरिकांनी विजयी करावे व या नव्या परिवर्तनास साथ द्यावी असे शिवसेना पक्षातर्फे मी आवाहन करतो असेही धंगेकर म्हणाले.

