पुणे- भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महापालिकेने प्रभाग रचना आणि प्रभागांच्या मतदार याद्या केल्याचाआरोप आज संजय बालगुडे यांच्या समवेत विचारवंत विश्वंभर चौधरी , वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाजप-महापालिका अधिकाऱ्यांचे साटेलोटे केले उघड:
काँग्रेस नेते संजय बालगुडे यांचा प्रारूप मतदारयाद्या संगनमताने बनवल्याचा आरोप
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये भाजप आणि मनपा अधिकाऱ्यांनी संगनमत करून फेरफार केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते संजय बालगुडे यांनी केला आहे. मतदारयाद्या जाहीर होण्यापूर्वीच मनपा कार्यालयांमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि अधिकारी बंद दाराआड याद्यांमध्ये बदल करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाल्याचे बालगुडे यांनी म्हटले आहे.बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदारयादी जाहीर होण्यापूर्वी काही दिवस आधीच महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात भाजपचे काही लोक उपस्थित होते. संबंधित कार्यालयांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मनपा अधिकारी आणि भाजपचे लोक बंद दाराआड मतदारयाद्या चाळत होते. प्रारूप यादी जाहीर होण्यापूर्वी २० ते २५ दिवस आधीच कोणत्या वॉर्डात कोणते मतदार टाकायचे, हे काम सुरू असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.हा लोकशाहीची हत्या करणारा मोठा कट असून, निवडणूक आयोग भाजपच्या आदेशानुसार काम करत असल्याचा आरोप बालगुडे यांनी केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाजपचे लोक मनपा अधिकाऱ्यांना सूचना कशा देत आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. सरकारी कार्यालयाचे दार लावून सलग साडेचार तास ही बैठक सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.प्रत्येक मतदारसंघातून हजारो मतदार बदलण्याचे काम करण्यात आले आहे. हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून, लोकशाही प्रक्रियेवरील दरोडा आहे, असे बालगुडे म्हणाले. मतदारयाद्या पारदर्शक आणि प्रामाणिकपणे तयार होईपर्यंत मनपा निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, कडी लावून ठराविक लोक बसून याद्या बदलत असतील, तर यात काय काळेबेरे आहे, याची चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.या पत्रकार परिषदेला ॲड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष गजानन थरकुडे उपस्थित होते. विश्वंभर चौधरी म्हणाले की, भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यात युती झाली असून, भाजपचे लोक मनपा अधिकाऱ्यांना मतदारयादीतील बदल समजावून सांगतात, हे धक्कादायक आहे. प्रत्येक प्रभागात अशाप्रकारे बदल केले गेले असून, रहिवाशांचे ठिकाण बदलून त्यांना लांबच्या मतदारसंघात टाकले गेले आहे.शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष गजानन थरकुडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मतदारयाद्यांचा घोळ निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत राहणार असल्याचे दिसून येत आहे.

