मता प्रतिष्ठान आयोजित फुले-आंबेडकर व्याख्यामालेत मार्गदर्शन
पुणे: “जुने आदर्श घेऊनच नवी पिढी पुढे जाईल. मात्र, आधीच्या पिढीने संवादाची दारे उघडी ठेवावीत. सद्यस्थितीत तरुणांमधील वाढती बेकारी, व्यसनाधीनता, गुन्हेगारी गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. त्याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. देशातील तरुणांच्या हाताला काम न देणे हा खरा राष्ट्रद्रोह आहे,” असे मत माध्यम तज्ञ प्रा. भारत पाटील यांनी केले.
महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठान संचालित ग्रंथालय व वाचनालयातर्फे महात्मा फुले वाड्यात आयोजित फुले-आंबेडकर व्याख्यानमालेत ‘तरुणांमधील वाढती बेकारी, व्यसनाधीनता आणि उद्रेक’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पथारी पंचायतचे नेते काशिनाथ नखाते होते.
प्रा. भारत पाटील म्हणाले, “व्यसनाची व्याख्या बदलली असून, मोबाईल हे नवे व्यसन बनले आहे. त्या उद्योगाचेही केंद्रीकरण होत असून, त्यावर लक्ष जाऊ नये म्हणून जातीजातीत भांडणे लावून दिली जात आहेत. यामध्ये कोवळी मुले भक्ष्यस्थानी पडत आहेत. उच्च शिक्षणात कमालीची घट झाली आहे. दहावी, बारावीनंतर विद्यार्थी, शाळा सोडल्याचा दाखला आणायलाही जात नाहीत. ही पिढी निराशेच्या गर्तेत जात आहे. रिकामे हात, रिकामे मेंदू यामुळे नवी पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यातून उद्रेक होण्याचा धोका वाढला आहे. नेपाळ आणि बांगलादेश ही त्याची उदाहरणे आपल्याला दिसत आहेत.”
काशिनाथ नखाते यांनी शासकीय धोरणांवर टीका केली. एका बाजूला रोजगार निर्मिती करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला, स्वयंरोजगारांना अटकाव करायचा. याची दखल समाजाने घेतली नाही, तर बेरोजगारांचा उद्रेक होईल, असे त्यांनी परखडपणे मांडले. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये न्यायालय न आणता, लवाद निर्माण केला आहे. लवाद हे सरकारी अपत्य असल्याची टीका त्यांनी केली.
कार्यक्रमाची सुरुवात फुले यांच्या अखंडाने झाली. प्रास्ताविक भाषणात ओंकार मोरे यांनी आजचा बेरोजगार युवक द्विधा मनस्थितीत असल्याचे सांगितले. आदर्शांना समाजासमोर, उभे करायचे आहे, पण उपाशी पोटी, तो भरकटत आहे, त्यातून त्याचा उद्रेक होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. शारदा वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे हारुण मुजावर यांनी आभार मानले.

