पुणे–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुणीतरी सांगितले पाहिजे की महाराष्ट्रामध्ये इतक्या वेळेस नरेंद्र मोदी आले आणि पारदर्शक कारभाराच्या नावाने त्यांनी मते मागितली आहेत. महाराष्ट्र सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फसवणूक सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्यावर जर कोणी आरोप करत असेल की आमच्याकडे पैसे नाही तर हे खरं आहे. आमच्याकडे काळा पैसा नाही. आम्ही काही पैसा वाटून निवडून आलेलो नाही. आम्ही जनतेच्या सेवेसाठी इथे आलेलो आहोत काही पैशाचा खेळ करण्यासाठी नाही, हा काही व्यवहार नाही. हे राजकारण आहे. इथे जर लोकं पैशाचा गैरवापर करत निवडून येत असतील आणि त्याचा सत्तेतील लोकांना सार्थ अभिमान असेल तर हे कुठल्याही लोकशाहीसाठी घातक आहे हा विषय मी हिवाळी अधिवेशनात मांडणार आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नीलेश राणे यांचे मी कौतुक करते त्यांचे मी जाहीर आभार मानते.ते नव्या पिढीचे राजकारणी आहेत. ते जर पारदर्शक कारभारासाठी लढत असतील तर तो लढा ते देताय ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण पैशावर निवडणूक झाली तर ज्यांच्याकडे सर्वाधिक पैसा आहे ते निवडून येतील आणि खरे लोकांची कामे करणारी लोकं निवडून येणार नाहीत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रियेमध्ये पैशाचा होणारा गैरवापर, सत्तेचा होणारा गैरवापर, उमेदवारी अर्ज दाखल न करुण घेणे हा जो विस्कळितपणा आणि गोंधळ महाराष्ट्रात यापूर्वी कधीच झाला नाही. हे आपले दुर्देव आहे की एवढं मोठे बहुमत या सरकारला दिले आहे. निवडणूक आयोगाबद्दल सर्वच जण विरोधात बोलत आहेत.
आयोगाने आता तरी जागे व्हावे
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक पुढे का गेली हे माहिती नाही. पण असे चित्र दिसून येत आहे की मतांसाठी पैशाचा वापर होत आहे हे हानिकारक आहे, हे चुकीचे आहे. माझी निवडणूक आयोगाला हात जोडून विनंती आहे की आता तरी जागे व्हा आणि हे सर्व बंद करा.

