साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षाची सांगता
साहित्यप्रेमी भगिनी मंडळ आयोजित ४१ वे स्त्री साहित्य संमेलन उत्साहात
पुणे : पुरुषप्रधानता, पितृसत्ताक समाजव्यवस्थेमुळे स्त्रीचे कायम दमन करण्यात आले. त्याचे अवशेष आजही टिकून आहेत. मात्र स्त्री ही स्वतः ऊर्जारूप आहे. तिची सर्जनशीलता शारीर सीमेपुरती मर्यादित करण्यात पुरुषप्रधान सामाजिक ढाचा कारणीभूत आहे. या मर्यादा स्त्रीने प्रत्यक्षात उल्लंघून सर्जनाची कित्येक क्षेत्रे आपलीशी केली आहेत आणि यापुढेही हे स्त्रिया करत राहतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध हिंदी कवयित्री, विचारवंत डॉ. सविता सिंह यांनी केले. शिक्षण आणि आर्थिक सत्ता, हे दोन महत्त्वाचे घटक स्त्रिया हाताळू लागतील, तशी परिस्थिती अधिक अनुकूल होत जाईल, असेही त्या म्हणाल्या.
स्त्रियांच्या साहित्यावर सातत्याने अभ्यास करणारी साहित्यिक व सांस्कृतिक संस्था असा लौकिक संपादन केलेल्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाची सांगता ४१व्या स्त्री साहित्य संमेलनात डॉ. सिंह अध्यक्षपदावरून बोलत होत्या. संमेलन आज (दि. ३०) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आले होते. मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव या संमेलनाचे उद्घाटक होते तर ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्ष, ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. मंदा खांडगे, कार्यवाह शलाका माटे, ज्योत्स्ना आफळे, मंजिरी ताम्हणकर हे मान्यवरही व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. सिंह पुढे म्हणाल्या, खिस्तपूर्व काळापासून उपलब्ध साहित्यिक संदर्भांमध्ये थेरीगाथांमधून तत्कालीन स्त्रियांनी स्वतःचे जगणे आणि अपेष्टामय जीवन वर्णन केले आहे. पुरुषप्रधानता आणि आर्थिक सत्ता, यांच्या जोरावर समाजात सदैव पुरुषी वर्चस्ववाद दिसत आहे. स्त्रीला वस्तू मानण्याची कुप्रथा तेव्हापासून आहे. स्त्रीला व्यक्त होण्याच्या शक्यता नव्हत्या. अल्पवयात विवाहामुळे तिला स्वतंत्र भवितव्यच उरले नव्हते. हे चित्र बदलायला फार वेळ लागला. पण ते हळूहळू बदलत गेलेले दिसते. हे बदल स्वागतार्ह आहेत. शिक्षणाने आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे आता हे बदल गतिमान होत आहेत. साहित्यनिर्मितीच्या संदर्भात तीन स्तरांवरचे लेखन विचारात घ्यावे लागेल. पुरुष लेखकांनी स्त्रियांसंबंधी केलेले लेखन, स्त्रियांनी मनोरंजनापलीकडे जात केलेले गंभीर लेखन आणि कुठल्याही बाह्य दबावाशिवाय निःसंकोचपणे व्यक्त झालेले स्त्रीचे मनोविश्व. हा तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. स्त्रीच्या जीवनाशी पुरातन काळापासून सर्जनशीलतेचा जो मुद्दा अविभाज्यपणे जोडला गेला आहे, त्या शारीरभावापलीकडे जाणारे स्त्रीचे विकार-वासनांचे भावविश्व, त्याचे स्वरूप, तिची ऊर्जा महत्त्वाची आहे, असेही त्या म्हणाल्या. हाच भाव मांडणाऱ्या स्वलिखित दोन कविताही त्यांनी सादर केल्या.
उमा कुलकर्णी यांनी कन्नड साहित्यातील स्त्रियांच्या लेखनाचा मागोवा घेत, विविध कालखंडातील स्त्रियांची लेखनवैशिष्ट्ये कथन केली. मराठी लेखिकांनीही भाषेपलीकडे जात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.
भाऊसाहेब जाधव यांनी संशोधनाधारित ग्रंथनिर्मिती सातत्याने करणारे मंडळ, अशा शब्दांत साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा गौरव केला. शिक्षणाचा प्रसार होत असल्याने आता ग्रामीण जीवनातील प्रश्नांचे व्यापक स्वरूप मुलींनी लेखनातून मांडावे, असे त्यांनी सुचवले.
स्वागतपर प्रास्ताविकात अंजली कुलकर्णी यांनी मंडळाच्या ६० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. लिहिणाऱ्यांनी एकत्र यावे, लिहिण्याचा प्रवृत्त करावे आणि एकमेकींच्या साथीने परस्पर जाणिवा लख्ख, समृद्ध होत जाव्यात, हा उद्देश आहे. मंडळ साहित्यिक, संशोधनपर आणि सेवाभावी उपक्रमांतून वाटचाल करत असल्याचे त्या म्हणाल्या.
वीणा जोगळेकर यांनी सरस्वतीस्तवन गायिले. संमेलनाला साहित्य, संशोधन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शलाका माटे यांनी सूत्रसंचालन केले.
‘सप्तधारा’चे प्रकाशन …
डॉ. सविता सिंह, डॉ. उमा कुलकर्णी आणि प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सात लेखिकांच्या कलाकृतींचा रसास्वाद मांडणाऱ्या ‘सप्तधारा’या ग्रंथाचे प्रकाशन साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा संशोधन विभाग व संस्कृती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने झाले. इरावती कर्वे, दुर्गा भागवत, इंदिरा संत, गोदावरी परुळेकर, डॉ. विजया राजाध्यक्ष, अनुराधा पाटील आणि आशा बगे या लेखिकांच्या साहित्याचा मागोवा या ग्रंथात ११ लेखिकांनी घेतला आहे. या लेखिकांचे अल्पपरिचयही ग्रंथात समाविष्ट आहेत. डॉ. मंदा खांडगे आणि डॉ. सुजाता शेणई यांनी संपादन केले आहे. ग्रंथाची माहिती देताना डॉ. सुजाता शेणई म्हणाल्या, केंद्र सरकारने १९५५ पासून साहित्य अकादमी पुरस्कारांचे वितरण सुरू केले. आजवर ६९ मराठी ग्रंथांना अकादमी पुरस्कार मिळाले. त्यापैकी ७ लेखिकांच्या साहित्यिक कर्तृत्वाचा रसज्ञ मागोवा, आस्वाद, संशोधनपर विश्लेषण आणि संदर्भ यांनी ग्रंथ परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी ज्येष्ठ लेखिकांचे प्रातिनिधीक सत्कार तसेच वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. हे. वि. इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी जीवन’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून होता. यात डॉ. दीपक शिकारपूर आणि डॉ. सुजाता महाजन यांचा सहभाग होता. त्यांच्याशी डॉ. प्रांजली देशपांडे यांनी संवाद साधला. प्रबंध एकादशी समिती पुरस्कृत डॉ. हे. वि. इनामदार पुरस्काराने प्रा. डॉ. आशालता कांबळे यांना गौरविले जाणार आहे.
तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यप्रेमी भगिनींचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक, अभिनेते अभिराम भडकमकर यांची मुलाखत शैला मुकुंद यांनी घेतली.‘गोष्टीवेल्हाळ तात्या’ या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथांचे अभिवाचन अक्षय वाटवे आणि सहकाऱ्यांनी केले तर संमेलनाच्या समारोप डॉ. कीर्ती मुळीक यांच्या उपस्थितीत झाला.

