शिक्षण प्रसारक मंडळी च्या पुढाकाराने आयोजन
पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने प्रशासकीय सेवेत अधिकारी असणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लेडी रमाबाई सभागृहामध्ये आयोजित केला आहे. शिक्षण प्रसारक मंडळीच्या पुढाकारातून हा मेळावा संपन्न होत आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश मोहरील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला स.प.महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश मोहरील आणि डॉ. संज्योत आपटे उपस्थित होते.
शिक्षण प्रसारक मंडळीने मागील वर्षापासून बी.ए, सिव्हिल सर्विसेस हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतीचे हे शताब्दी वर्ष आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे ही हे शताब्दी वर्ष आहे. या सर्व गोष्टींचा संगम साधून महाविद्यालयाने हा मेळावा आयोजित केला आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात हा मेळावा असेल.
लेडी रमाबाई सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष सदानंद फडके, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड.एस.के.जैन, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, सचिव डॉ. राधिका इनामदार व शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन होईल.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश मोहरील म्हणाले, संसदेचे माजी सदस्य, सिक्कीमचे माजी राज्यपाल, प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले आय.ए.एस अधिकारी व महाविद्यालयाचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. या उद्घाटन समारंभात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असणारे असे प्रशासकीय सेवेतील पन्नासहून अधिक अधिकारी सहभागी होतील. या सर्वांचे स्वागत व सत्कार या समारंभात करण्यात येईल.
उद्घाटन समारंभानंतर नागरी सेवेत काम करण्यास इच्छुक असणाऱ्या व त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांमध्ये प्रशासकीय अधिकारी सहभागी होतील. त्यांच्या तेथील व्याख्यानांमधून ते विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेबाबत मार्गदर्शन करतील. महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळेस या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधतील. या संवादातून सध्याच्या या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेतील विविध संधींची माहिती मिळेल, ते प्रेरित होतील, राष्ट्रहित,राष्ट्राचा विकास, सामाजिक बांधिलकी यासाठी ते जागरूक होतील, अशी आशा आहे.
यानंतर विद्यार्थ्यांसमवेत हे अधिकारी महाविद्यालयाच्या परिसरात फिरतील. त्यांच्या काळात कार्यरत असणाऱ्या महाविद्यालयाच्या माजी शिक्षकांशी त्यांच्या भेटीगाठी होतील. जुने ऋणानुबंध पुन्हा जागे होतील व या अधिकाऱ्यांच्या महाविद्यालयातील आपल्या स्मृतींना उजाळा मिळेल. महाविद्यालयाशी असणारा त्यांचा अनुबंध घट्ट होईल. यानंतर महाविद्यालयातील कला मंडळाच्या विद्यमान विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने मेळाव्याचा समारोप होईल. मेळाव्यात आय.ए.एस, आय.पी.एस, आय.आर.एस व इतर प्रशासकीय सेवेतील अधिकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या विविध संवर्ग सेवेतील अधिकारी या मेळाव्यात सहभागी होत आहेत.
*स.प. महाविद्यालय इमारतीच्या शताब्दी वर्षात विविध कार्यक्रम
शिक्षण प्रसारक मंडळीने सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या इमारतीच्या या शताब्दी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्र बांधणी व देशाचा विकास, सामाजिक बांधिलकी व सामाजिक कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग ही उद्दिष्टे निश्चित करून विविध कार्यक्रमांचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळी वर्षभर करणार आहे. नागरी सेवेत अधिकारी असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हा यातील पहिला कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
*संस्था व महाविद्यालयाविषयी
शिक्षण प्रसारक मंडळी ही पुण्यातील एक नामवंत अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेला शंभर वर्षांहून मोठी उज्ज्वल परंपरा आहे. या संस्थेकडून १९१६ मध्ये पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. आज हे महाविद्यालय अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय आहे. मोठी परंपरा व वारसा असणाऱ्या या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविल्या आहेत. या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आज हे विद्यार्थी समाजामध्ये प्रतिष्ठित नागरिक आहेत. आम्ही सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत; हे ते अभिमानाने सांगतात. महाविद्यालयाबरोबरचे त्यांचे बंध भक्कम राहिले आहेत. महाविद्यालयातील अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत असतात. मूल्यात्मक शिक्षण, राष्ट्रहित व राष्ट्राचा विकास हे महाविद्यालयाचे नेहमीच धोरण राहिले आहे. उज्ज्वल परंपरा, वर्तमानाचे भान व भविष्याचा वेध घेत हे महाविद्यालय आपली शतकोत्तरी वाटचाल करीत आले आहे.

