उद्रेक आज गुन्हेगाराविरोधात आहे. उद्या तो सरकार विरोधात होईल. एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांचा दरारा होता, आता गुन्हेगारांवर धाक राहिलेला नाही.गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे- वडेट्टीवार
आरोपीची बाजू एकही वकील मांडणार नाही – दादा भुसे
नाशिक – मालेगाव 3 वर्षीय चिमुरडीवरील बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे होरपळून निघाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ येथील नागरिकांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक देऊन मोर्चा काढला होता. पण मोर्चेकऱ्यांनी थेट स्थानिक न्यायालयाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका 3 वर्षीय मुलीवर गावातीलच विजय संजय खैरनार नामक आरोपीने पाशवी बलात्कार केला होता. त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्याही केली होती. या प्रकरणाचे सध्या राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी नागरिकांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक दिली होती. त्याला व्यापारी संघटना, शाळा व महाविद्यालये, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रकरणी रामसेतू पुलावरून एक मोर्चाही काढण्यात आला. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आला. यावेळी मोर्चकऱ्यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या मोर्चात मंत्री दादा भुसेही सहभागी झाले होते.
यावेळी काही मोर्चेकऱ्यांनी अचानक स्थानिक न्यायालयाच्या परिसरात शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ माजली. मोर्चेकरी थेट कोर्टाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून मोर्चेकऱ्यांना न्यायालय परिसरात प्रवेश न करता आपल्या मार्गाने जाण्याचे आवाहन केले. पण मोर्चेकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला. हे पाहून मोर्चेकऱ्यांची एकच धावपळ उडाली. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर शेकडो मोर्चेकरी कोर्टाच्या परिसरात जमले होते. तिथे त्यांची आणखी समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेनंतर कोर्टाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
तत्पूर्वी, मोर्चाला मार्गदर्शन करताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शहरातील एकही वकील आरोपीची बाजू मांडणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, मालेगावच्या वकील संघाने बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची बाजू कोर्टात न मांडण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपीची पोलीस कोठडी संपलेली असताना आपले डीवायएसपी बाविस्कर यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली, हे निषेधार्थ आहे. त्याचा मी धिक्कार करतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची भूमिका घेतली असताना डीवायएसपींनी न्यायालयीन कोठडी मागितली. हे कुणाच्या सांगण्यावरून केले? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मी मागी केल्यानंतर पोलिसांनी एमसीआरची मागणी बदलून पीसीआरची मागणी केली. त्यामुळे या डीवायएसपींची बदली झाली पाहिजे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, असे भुसे म्हणाले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मालेगावात आज झालेला जनतेचा उद्रेक उद्या सरकार विरोधात होण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, मालेगाव इथे आज जमाव कोर्टात शिरला हा जनतेचा उद्रेक आहे. हा उद्रेक आज गुन्हेगाराविरोधात आहे. उद्या तो सरकार विरोधात होईल. एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांचा दरारा होता, आता गुन्हेगारांवर धाक राहिलेला नाही.गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे आपल्याला न्याय मिळणार नाही अशी भावना लोकांची होत असल्याने कोर्टात जमाव घुसला. यातून आता तरी पोलिस खाते अंक सरकारने सुधारले पाहिजे.
आमचे सरकार असताना आम्ही अशा प्रकरणासाठी शक्ती कायदा आणला होता,तो अमलात आणला जात नाही, पोस्को कायद्याची अंमलबजावणी होत नाही. मालेगाव प्रकरणात एक महिन्यात फास्टट्रॅक वर केस चालवून आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असे ते म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपीची 5 दिवसांची पोलिस कोठडी काल संपुष्टात आली होती. त्याला कोर्टात सादर करत असताना संतप्त महिलांनी पोलिसाना गराडा घातला. यामुळे बाका प्रसंग उद्धवला होता. दुसरीकडे, भाजप आमदार चित्रा वाघ यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष प्रकार झाला. अशी घटना ऐकल्यावर काळीज पिळवटून निघते. सकाळपर्यंत खेळणारी, दुडूदुडू धावणारी सापडेना म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला.
गावभर शोध घेतल्यानंतर ती गंभीर अवस्थेत आढळली. नंतर मृत्यू झाल्याचे समजले आणि होत्याचे नव्हते झाले. प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, गावातील 24 वर्षाचा तरुणाचं एक महिन्यापूर्वी तिच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. त्याने त्या निरागस बाळावर असूरी पद्धतीने राग काढला. तिच्यावर अत्याचार करून तिचा जीव घेतला. समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ आहे, असे वाघ म्हणाल्या होत्या.

