मुंबई-काँग्रेसने आज अखेर मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. पक्षाने या प्रकरणी मारझोड करणाऱ्यांसोबत अर्थात मनसेसोबत जाण्यास ठाम नकार देत उद्धव ठाकरे यांना स्वतःचा निर्णय घेण्याची पूर्ण मोकळीक दिली. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी म्हणून राज ठाकरे यांच्या मनसेशी युती करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जबर झटका बसला आहे.
मुंबई येथे आज मुंबई काँग्रेसचे एकदिवसीय शिबिर सुरू आहे. त्यात मुंबईच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची मागणी केली. त्यानुसार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. ते म्हणाले, काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढेल. आम्ही सर्व 227 जागा लढवू. आमची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी व सर्व पदाधिकाऱ्यांची ही निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा मान राखत आम्ही हा निर्णय घेतला.
ही काही लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक नाही. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते जे म्हणतील तेच होईल. भविष्यात काँग्रेसला मजबूत बनवणे हे आमचे काम आहे. काँग्रेस मजबूत व्हावी अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या भावनांचा मान राखत हा निर्णय घेतला आहे, असे चेन्नीथला म्हणाले.
तत्पूर्वी, वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडली. त्या म्हणाल्या, आम्ही देशाचे संविधान मानणारी मंडळी आहोत. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणारे लोक आहोत. मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाले तर आम्ही सातत्याने मुंबईच्या विकासावर बोलतो. आम्ही रोज मुंबईकरांचा त्रास पाहत आहोत. या प्रकरणी सर्वांनी एकत्र येऊन बोलण्याची गरज होती. कारण, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जी मारहाण केली जाते किंवा कायदा सुव्यवस्था हातात घेतली जाते. विशेषतः त्यांच्याकडून जी भाषा वापरली जाते, ती भाषा आमच्या सुसंस्कृतपणाला शोभणारी भाषा नाही.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, महाविकास आघाडीमध्ये आम्ही किमान समान कार्यक्रमावर चालण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम सर्वांसाठी असला पाहिजे. संविधानाच्या धाग्यातून असला पाहिजे. परंतु काही पक्षांची भूमिका ही मारहाणीची राहिली आहे. लोकांना त्रास देण्याची राहिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी त्यांचा योग्य तो निर्णय घ्यावा. पण सध्या ते ज्या लोकांशी चर्चा करत आहेत, त्यांच्याशी आमचे कितपत जमेल हे आम्हाला माहिती नाही.
एखाद्या छोट्या टपरीवाल्याला किंवा एखादा दुकानदाराला अथवा एखाद्या समोसेवाल्याला मारहाण करणे ही संस्कृती काँग्रेसमध्ये केव्हाही खपली जाणार नाही. त्यामुळे मला असे वाटते की, जे अशा तऱ्हेने कारवाई करतात किंवा मोठ्या उद्योगपतींवर बोलण्यापेक्षा छोट्या – छोट्या माणसांवर आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेने (ठाकरे गट) त्यांना कुणासोबत जायचे त्याचा निर्णय घ्यावा. पण काँग्रेस पक्ष म्हणून आमचे म्हणणे आहे की, मुंबईत आलेली सर्व मंडळी ही मुंबईकर आहेत. सर्वांनी मुंबईच्या विकासात हातभार लावला आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

