बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, सध्याच्या कलानुसार एनडीए आघाडीने भक्कम बहुमत मिळवले आहे, ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच निकालावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. या निकालांचा धक्का बसलेला नाही, असे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाचे अभिनंदन केले आणि उपरोधाने म्हटले की, हा निवडणूक आयोगाचा विजय आहे. भाजपने आता अमेरिकेतही निवडणूक लढवली, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, जसे तुम्ही पाहिले तसे आम्ही पाहिले आहे. जे काही निकाल आले त्याचा धक्का बसलेला नाही. मी निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो हा त्यांचा विजय आहे. मतदानाचा अधिकार काढून टाकल्यावर काय होत हे आज दिसले, असे ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच नितीश कुमार यांची पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरू होती. तेजस्वी यादव यांचा अजेंडा नोकऱ्या देणे हा होता. राहुल गांधी यांनी वोट चोरी दाखवली. वोट चोरी झाली होती. लवकरच आम्ही सगळे मुद्दे बाहेर काढू अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा साधला. आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करतो आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला उत्तर देतात, असा टोला त्यांनी लगावला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत त्यांनी ‘चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही’ असे स्पष्ट केले. तसेच, राज्यात ‘व्होट चोरी’ झाली असून, ती चोरी पकडण्याचे काम सुरू आहे. याची प्रारूप यादी अजूनही आलेली नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ठाकरे यांच्या मते, त्यांचा धसका घेऊन निवडणूक आयोग काम करत आहे.
बिहारमध्ये गेलेले भाजप नेते आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची वाट पाहतील, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यांनी आरोप केला की, भाजपचे कार्यकर्ते मतदानात सक्रिय आहेत. महिला मतदारांविषयी बोलताना ते म्हणाले की, महिलांचे मत मिळवण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे, केवळ टॅक्सपेयरचा पैसा वळवून किंवा ₹1,500 देऊन महिला मतदान करत नाहीत. अशा प्रकारे, त्यांनी मतांसाठी ‘टॅक्स पेयर’च्या पैशाचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आणि महिलांच्या राजकीय जाणिवांबद्दल भाष्य केले.

