पुणे – “गुन्हेगारासोबत फोटो आहे म्हणून त्या गुन्हेगारी कृत्यात आमचा सहभाग आहे असे होत नाही. आम्ही कधीही गुन्हेगारीला पाठिंबा दिला नाही. एखाद्या नेत्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या प्रयत्नात अप्रत्यक्षपणे शहराचीच बदनामी होते. शहरात परदेशी उद्योग, कंपन्या येत असताना अशा नकारात्मक गोष्टींमुळे शहराच्या प्रतिमेवर परिणाम होतो,” असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन कोथरूड परिसरातील अलीकडील गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माध्यमांना माहिती दिली.
पाटील म्हणाले, “दिवसाला दोन-तीन हजार लोक भेटायला येतात. त्यात एखादा गुन्हेगार असू शकतो. त्याने फोटो काढला म्हणजे आम्ही त्याच्या गुन्हेगारी कृत्याला समर्थन दिले, असे होत नाही. आम्ही स्पष्ट सांगतो – आमच्या नावाने कोणी सोडवून देण्याची विनंती केली, किंवा आमचा फोन आला, तरी त्याला जुमानू नका. गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडे मोडायचे ठरवले आहे. यासाठी पोलीस ठोस कारवाई करतील. लेखी तक्रारी द्या; त्यावर तातडीने कारवाई व्हावी, असे आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितले आहे.”
ते पुढे म्हणाले, “शहरात रोजच्या जीवनात दहशत निर्माण होईल असे प्रकार होऊ नयेत, यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलवून त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांत खुनाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. गुन्हेगारीवर पोलिसांचा दबदबा वाढला आहे.”
कोथरूड परिसरातील काही संवेदनशील घडामोडींवर बोलताना पाटील म्हणाले, “कोथरूड हा हिंदू बहुल भाग आहे. येथे अलीकडे मुस्लिम तरुणांच्या काही हालचाली दिसत आहेत. या धार्मिक कारणांवरून वातावरण बिघडू नये, म्हणून पोलिसांनी वेळीच दक्षता घ्यावी. प्रत्येक धर्माचा आदर राखला पाहिजे. परंतु उपासना कुठे, कशी आणि केव्हा करायची याबाबत शिस्त आवश्यक आहे. धर्मादाय आयुक्तांनी कोथरूडमधील एका दर्ग्याच्या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.”
गुन्हेगार गायवळच्या पासपोर्टप्रकरणाचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले, “गायवळला पासपोर्ट कोणी मिळवून दिला, हे सर्वांनाच माहीत आहे. काही मोठी नावे यात आहेत, पण त्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. काहीही ठोस पुरावे नसताना एखाद्या नेत्याला ‘डॅमेज’ करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. त्यातून शहराची प्रतिमा खराब होते. एकनाथ शिंदे माझे परम मित्र असून, महायुती सरकार म्हणून आम्ही सर्व प्रश्न सोडवू.”
ते म्हणाले, “मुख्यमंत्री अल्पवयीन गुन्हेगारांच्या वाढत्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. यावर ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत.

