पुणे –
जैन बोर्डींग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय विशाल गोखले यांनी घेतला आहे.अशी माहिती शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी येथे रात्री उशिरा सोशल मिडिया मधून दिली . या जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय गोखले यांनी ईमेल वरुन ट्र्स्टला कळवला असल्याची माहिती आहे. या व्यवहारातून बाहेर पडण्याचा गोखले यांनी निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखले याचं ईमेल मध्ये म्हणणं आहे. याशिवाय जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, असंही विशाल गोखले यांनी म्हटलं आहे.
राजू शेट्टी यांच्या आज संध्याकाळी केलेल्या आवाहानानंतर गोखले यांच्याकडून जैन बोर्डिंग ट्रस्ट सोबत झालेला व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यवहार रद्द करण्याच्या निर्णयाची माहीती राजू शेट्टी यांना कळवली गेली असल्याची माहिती आहे. दरम्यान, गोखले बिल्डर जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यासंदर्भात अर्ज देण्याची शक्यता आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दुपारी 86 हून अधिक जैन संस्था, संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत जैन बोर्डिंग विकण्याचा निर्णय ट्रस्टींनी घेतला तो बेकायदेशीर आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर असताना 60 वर्षांहून अधिक वर्ष सुरु असलेल्या वसतिगृहाची जागा विकणं ही लाजिरवाणी बाब आहे. हा व्यवहार ट्रस्टींनी रद्द करावा,अशी विनंती ट्रस्टींना करण्याचं त्याचबरोबर ही प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे त्या गोखले बिल्डर यांना विनंती करण्याचा ठराव झाला, असं राजू शेट्टी म्हणाले. गोखले बिल्डरला केलेल्या विनंतीनुसार त्यांनी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला आहे. जोपर्यंत हा विक्री व्यवहार रद्द होत नाही, या मालमत्तेवर गोखले बिल्डरचं नाव चढलेलं आहे ते काढून जैन बोर्डिंगचं नाव लागत नाही तोपर्यंत लढा संपणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले. व्यवहार पूर्णपणे रद्दबातल झाला पाहिजे, सरकारनं पुढाकार घ्यावा, असं राजू शेट्टी म्हणाले.


पुण्यात मोक्याच्या जागी असणाऱ्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गदारोळ सुरु होता. ही जागा गोखले बिल्डर्सने विकत घेतली होती.गोखले बिल्डर्स आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) केला होता. रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरले होते. अखेर रविवारी रात्री विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी जैन बोर्डिंग हाऊसला ई-मेल पाठवून जागेचा व्यवहार रद्द झाल्याचे सांगितले. यानंतर रवींद्र धंगेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Jain Boarding House Land)
पुढील दोन दिवस मी मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल काही बोलणार नाही. येत्या दोन दिवसांत जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेचा व्यवहार रद्द करावा. एकनाथ शिंदे यांनी मला सांगितले की, दोन दिवसांत तोडगा निघेल. त्यामुळे मी आज आनंदी आहे. चंद्रकांत पाटील हे आज अमित शाह यांचा निरोप घेऊन मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आले होते. त्यामुळे आता दोन दिवसांत जैन बोर्डिंगचा पूर्ण व्यवहार रद्द झाल्यावर मी मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवेन, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
हा गतीमान आणि बोगस व्यवहार झाला, त्याची चर्चा संपूर्ण देशात झाली. विशाल गोखले यांनी ई-मेल पाठवला असेल तरी मला अद्याप विश्वास नाही. जोपर्यंत हा व्यवहार रद्द होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आता ट्रस्टीच पळून गेले तर त्यांना कुठून पकडून आणणार. ट्रस्टींनी हा व्यवहार केला होता. खऱ्या अर्थाने विशाल गोखले खूप पैसेवाला नाही. तो पूर्वी लहान होता. पण 10-12 वर्षांत मुरलीधर मोहोळ पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले तेव्हापासून विशाल गोखले यांची संपत्ती वाढत गेली. पण मला या विषयावर बोलायचं नाही. कारण मला शिंदे साहेबांनी सांगितले आहे की, यावर बोलायचं नाही. विशाल गोखले हा दिलेल्या भाकरीचा आणि सांगितलेल्या कामाचा आहे. विशाल गोखले खूप मोठा माणूस नाही. त्याला व्यवहार कोणी करायला सांगितला आणि नंतर कोणी काढायला लावलं यावर आपल्यलाा बोलायचे नाही. पण दोन दिवसांत हा व्यवहार कायदेशीरदृष्ट्या संपला पाहिजे. मी आता रात्रीही हा व्यवहार करणाऱ्या रजिस्ट्रारला आणू शकतो. तो कुठे राहतो, मला माहिती आहे. दोन दिवस मी गप्प बसेन हा शब्द मी एकनाथ शिंदे साहेबांना दिला आहे. ते माझे नेते आहेत. त्यांच्या मानसन्मान ठेवणं माझं काम आहे. पण मी त्यांच्याकडून शब्द घेतला आहे की, मी चुकीचं वागणार नाही. पण चुकीचं घडत असेल तर मी बोलणार, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.

