पुणे- अखेर केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ जैन मुनींच्या सभेत हजर ,म्हणाले अन्नत्याग करू देणार नाही, त्या अगोदर समाजाची मागणी मान्य आहे..जैनमुनी म्हणाले, १ नोव्हेंबर च्या आधी जैन धर्माच्या या मंदिराचे जागेचे डील रद्द होत नाही तोपर्यंत संतुष्ट होणार नाही अन्यथा प्राणत्याग देखील करेल .पण आपणावर तशी वेळ येऊ देणार नाही असे त्यांना मोहोळ यांनी आश्वस्त केले .
जैन बोर्डिंग घोटाळ्यावरून सातत्याने आरोप होत असताना, खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज जैन बोर्डिंग उपोषणस्थळी जाऊन जैन मुनींची भेट घेतली. शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यासह विरोधकांच्या वाढत्या आक्रमक भूमिकेमुळे मोहोळ यांच्या अडचणी वाढल्या असताना, या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले. “मी या प्रकरणात सहभागी आहे किंवा माझे कोणीतरी सहभागी आहे, असे आरोप केले गेले. परंतु माझा यामध्ये कोणताही सहभाग नाही, हे मी वारंवार पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मी येथे केवळ वंदनीय जैन गुरुदेवांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. जर मी दोषी असतो, तर इथे येताना 100 वेळा विचार केला असता आणि आलोच नसतो.” मोहोळ यांनी आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना स्पष्ट केले की, या संपूर्ण विषयावर केवळ राजकारण झाले आणि वैयक्तिक हेतूने या गोष्टी वाढवल्या गेल्या.
जैन समाजाला संबोधित करताना मोहोळ यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. “मी आपल्याला आश्वासित करतो की, या प्रकरणात योग्य न्याय होईल. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल. काही दिवसांत हा प्रश्न आपल्या मनासारखा संपेल,” असे ते म्हणाले. “लोकप्रतिनिधी आणि खासदार म्हणून मला तुम्ही निवडून दिले आहे. हा विषय संपवण्यासाठी तशी भूमिका घेण्यासाठीच मी इथे आलो आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जैन मुनींनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “जोपर्यंत तुम्ही हा विषय संपवत नाही, तोपर्यंत आम्ही समाधानी नाही.” तसेच, प्रसार माध्यमांनी हा विषय लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. यावर प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींनी दिलेल्या सूचना आपण लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण करू, त्यासाठीच आपण इथे आलो आहोत, असे आश्वासन दिले.
या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुढच्या काळात काही निर्णय होणे अपेक्षित असेल, तर या शहराचा खासदार, लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका महत्त्वाची यामध्ये काय असावी, याबाबत जेव्हा विषय झाला. मी माझ्या जैन बांधवांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, राजकीयदृष्ट्या आरोप-प्रत्यारोप खूप झाले. काही लोकांना या विषयाचा आधार घेऊन व्यक्तीगत पातळीवर जाऊन टीका केली. पण माझ्या जैन बांधवांनी एकही दिवस, एकदाही कधी माझे नाव या विषयात घेतले नाही.
राजू शेट्टी हे जैन समाजाचे येतात, त्यामुळे त्यांनी शंका उपस्थित केली होती की कदाचित मी पार्टनरशिप असलेल्या विकासकाने हा जैन बोर्डिंगचा व्यवहार केलाय. पण ज्यावेळी मी स्पष्टपणे माझे कागदोपत्री आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतर, पुढे कुठेही असा विषय जैन समाजातून आला नाही. परंतू याचा वेगळा गैरफायदा स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी, राजकीय अस्तित्व जीवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्याने चालवले.
मागील दोन दिवसांपूर्वी जैन धर्मियांचे गुरुदेव आज या ठिकाणी या विषयासाठी बसलेले आहेत. त्यांचे शांततेत आंदोलन चालू आहे. त्यांनी मला आवाहन केले की, तुम्ही पुण्याचे लोकप्रतिनिधी आहात, आमच्या जैन समाजाला तुमची मदत हवीये. तुम्ही येथे या आणि आमच्यासाठी उभे राहा. या प्रकरणात जे काही राहिले, त्याबाबत पडदा दूर होईल, असे आवाहन त्यांनी केले.
माझा या प्रकरणात काही सहभाग असता, तर मी इथे येताना शंभरवेळा विचार केला असता. आलो नसतो. समाजाची आणि माझी या विषयातील भूमिका स्पष्ट आहे. इथे आल्यानंतर माझी भूमिका मांडली. लवकरात लवकर हा विषय संपला पाहिजे, असे गुरूदेवांनी सांगितले. हा व्यवहार रद्द होण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे, असेही त्यांनी मला सांगितले. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेऊन हा विषय कसा सोडवता येईल? यासाठी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत उभा आहे. लवकरात लवकर यातून मार्ग काढू, असे मी त्यांना आश्वस्त केल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
मुरलीधर मोहोळ जैनमुनींची भेट घेऊन बाहेर निघाल्यानंतर जैन बांधवांनी त्यांना घेराव घातला. यावेळी जैन बांधव मुरलीधर मोहोळांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बोर्डिंग संदर्भात झालेला व्यवहार रद्द करावा, अशी मागणी जैन बांधवांनी यावेळी केली, तसेच जैन बोर्डिंग वाचवा, अशी घोषणाबाजी केली.

