पौड फाटा ते बालभारती हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होता.रस्त्याला विरोध करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्या काही भूमिका असतात त्याबद्दल आम्हाला आदर आहे.प्रसंगी आम्ही त्यांच्याशी संघर्षही केला.लोकशाही आहे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केलेली फेटाळून लावली.मुंबई उच्च न्यायालयाने देखील याचिका फेटाळली होती त्यानंतर याचिका करणाऱ्याने CEC कडे देखील अपील केले.CEC कडे अधिकार नसताना त्यांनी सुनावणी घेतली, त्यालाही आम्ही विरोध केला होता.आमची महानगरपालिका आयुक्त यांना विनंती आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे environment clearance certificate त्वरित प्राप्त करून या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे.मागच्या वेळेला स्थगिती नसताना देखील दबावाखाली महानगरपालिका प्रशासनाने काम सुरू केले नव्हते नवीन आयुक्तांनी तातडीने याबाबत प्रशासनाला आदेश देऊन पुढील प्रक्रिया निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी करावी. :उज्ज्वल केसकर-माजी विरोधी पक्ष नेता,सुहास कुलकर्णी-माजी विरोधी पक्षनेता
पुणे-बालभारती पौड रोडला जोडणाऱ्या वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याला महापालिकेने पर्यावरण परवानगी घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या मार्गाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बालभारती ते पौड रस्त्यादरम्यानचा सुमारे दोन ते सव्वादोन किलोमीटरचा रस्ता भांडारकर संस्थेजवळील टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याला आक्षेप घेत काही सामाजिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सर न्यायाधीश भूषण गवई आणि विनोद चंद्र यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. शिवाजीनगर आणि कोथरूड परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग असलेल्या या रस्त्याला पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या विरोधामुळे बराच विलंब झाला आहे.
यामुळे प्रकल्पाचा खर्च देखील काही पटीत वाढला आहे, ही बाब महालिकेच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने महापालिकेने याकामासाठी इन्व्हायर्न्मेंट क्लिअरन्स घ्यावा आणि त्यानंतर काम करावे असे आदेश न्यायालयाने दिले, अशी माहिती महापालिकेच्या विधी अधिकारी निशा चव्हाण यांनी दिली. न्यायालयाची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर अधिक तपशील समजू शकेल असे त्या म्हणाल्या. महापालिकेच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ऍड. अभिजीत कुलकर्णी, ऍड. राहुल गर्ग, ऍड. धवल मल्होत्रा आणि ऍड. निशा चव्हाण यांनी काम पाहिले. डॉ. सुषमा दाते आणि आय एल एस विधी महाविद्यालय या प्रकरणी न्यायालयात गेले होते.
प्रकल्पाबद्दल आक्षेप आणि न्यायालयीन वाद
पर्यावरणीय चिंता : रस्ता वेताळ टेकडीच्या हरित पट्ट्यातून जातो, ज्यामुळे झाडे तोडली जातील अशी भीती आहे.
- पर्यावरणवादी संघटनांचा विरोध : नागरी चेतना मंच, सुषमा दाते आणि इतर पर्यावरणप्रेमींनी यावर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.
- सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी (CEC) ने ‘हा भाग Deemed Forest मध्ये मोडतो’ असे निरीक्षण दिले आणि बांधकाम थांबविण्याची सूचना केली.
- पुणे महापालिकेचा दावा : रस्ता वेताळ टेकडीला विना बाधक पद्धतीने आणि फ्लायओव्हर तंत्राने बांधण्यात येईल, त्यामुळे पर्यावरणाला हानी होणार नाही.
आक्षेप -.वेताळ टेकडीतील झाडे, जैवविविधता आणि भूजल पातळीवर परिणाम होईल.
’डोंगर फोडून रस्ता’ केल्यास पर्यावरणीय समतोल बिघडेल.
विद्यमान रस्त्यांचे सुयोग्य नियोजन केल्यास हा नवीन रस्ता आवश्यक नाही
प्रकल्पाचे फायदे
एफ.सी. रोड, गणेशखिंड रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होईल.
कोथरूड-शिवाजीनगर प्रवासात वेळ वाचेल (सुमारे 20-25 मिनिटांची बचत).
शिवाजीनगर आणि चांदणी चौक-पुणे सेंट्रल दरम्यान वाहतूक पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.
प्रकल्पाचा सारांश सविस्तर माहिती-
रस्त्याचे नाव बालभारती ते पौड फाटा रस्ता
अंतर सुमारे 2.1 ते 2.3 किमी रुंदी अंदाजे 30 मीटर

