पुणे-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदाशिव पेठेतील कार्यालयाची तोडफोड करुन कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह 20 ते 30 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत ‘अभाविप’च्या कार्यकर्त्या संजीवनी कसबे (वय 20) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘मनविसे’चे पदाधिकारी धनंजय दळवी, केतन डोंगरे, आशितोष माने, महेश भोईबार, हेमंत बोळगे यांच्यासह 20 ते 30 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते १३ ऑक्टोबर दुपारी साडेतीनच्या सुमारास सदाशिव पेठेतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात शिरले. अभाविपच्या कार्यालयातील कार्यकर्ते सार्थक वेळापुरे यांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. कार्यालयाची तोडफोड करुन त्यांनी अभाविपच्या कार्यालयातील भिंतीवर पत्रक चिकटवले. कार्यालयाला कुलूप लावून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथून निघून गेले, असे संजीवनी कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार, सहायक निरीक्षक राजेश उसगांवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक एस सुरवसे तपास करत आहेत.

