मुंबई -लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘मतचोरी’ झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक यंत्रणेतील दोष आणि ईव्हीएममधील कथित गैरव्यवहारांवर चर्चा करण्यासाठी विरोधकांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज (मंगळवार) मुंबईत राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. सुमारे तास-दीड तास ही बैठक झाली. पण आजच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित राहिल्याने उद्या पुन्हा ही बैठक होणार आहे.शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप) शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रईस शेख, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे, कॉ. प्रकाश रेड्डी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता . दरम्यान, यशवंतराव चव्हाण सेंटर येथील पत्रकार परिषद होणार नाही. उद्या आमची बैठकीतील निष्कर्षानंतर ती पत्रकार परिषद होईल. आता तिथे कोणतीही पत्रकार परिषद होणार नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.चोकलिंगम यांच्यासोबतच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णित आहेत. ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी चोकलिंगम यांची एकत्र भेट आणि चर्चा हे शिष्टमंडळ घेतील. त्यामुळे उद्याच पत्रकारांना भेटून माहिती देऊ, असा निरोप शिष्टमंडळाकडून आलेला आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

चोकलिंगम यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील मतदारयादीतील घोळ सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी सर्व विरोधीपक्षाच्या वतीने भेट घेतली. राज ठाकरे यांनी अनेक आणलेली निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींची अनेक उदाहरणे पुराव्यानिशी दिलेली आहेत. महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत प्रचंड गोंधळ असल्याचे बऱ्याच मतदारसंघात दिसतंय. तीच निवडणूक यादी १ जुलैला गोठवून, त्या यादीवर निवडणुका घेतल्या, तर तो गोंधळ पुन्हा चालू होईल, आम्ही याला आक्षेप घेतला आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून सीईओ चोकलिंगम यांनी एकत्रित यावे आणि आमचे म्हणणे ऐकावे, अशी मागणी आम्ही केली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की, उद्या ते दोघे एकत्रित येऊन आमचे म्हणणे ऐकतील. आम्ही त्यासाठी सादर केलेले पुरावे त्याची पुन्हा चर्चा होईल. महाराष्ट्रात जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका निवडणुका घेण्याआधी राज्यातील सगळ्या निवडणूक याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. उद्या सकाळी अकरा वाजता आमची पुन्हा बैठक होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
आज आम्ही निवडणूक आयोगाला भेटून जी मागणी करतोय, अशीच मागणी भाजपचे लोक पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाकडे करत आहेत. केरळ आणि कर्नाटकमध्येही भाजप अशीच मागणी करतोय. त्याच मागणीसाठी आम्ही निवडणूक आयोगाला भेटत असताना भाजप नेत्यांनी सुद्धा आमच्याबरोबर राहावे, ही आमची भूमिका आहे. देशाचे संविधान आणि लोकशाही यानुसार निवडणुका व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सगळ्यांची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले.
आजच्या बैठकीत राज ठाकरेंनी उपस्थित केलेले मुद्दे
निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली?
जे आज 18 वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का?
दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव.
मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ.
वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी.
निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता?
31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का?
ठाकरे बंधू, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात हे निवडणूक अधिकऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले . शिवालयातून निघाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मंत्रालयातील सातव्या मजल्यावर दाखल झाले होते . राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यावेळी सोबत दिसून आले. शरद पवार देखील अनेक वर्षांनी मंत्रालयात पोहोचलेले पाहायला मिळाले.
पराभव दिसतो तेव्हा कारणे बघावी लागतात. ताकद नसल्यावर रडीचा डाव केला जातो, हा त्यातलाच प्रकार असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
निवडणूक आयोगात जाण्याआधी शिष्टमंडळाचे सर्व नेते शिवालयात जमले होते. या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची याबाबत चर्चा झाली. दुसरीकडे विरोधकांचे शिष्टमंडळ भेटीला येण्याआधी राज्य निवडणूक आयोगातही अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान ‘मतचोरी’ झाल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याच संदर्भात, निवडणुकीच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल वाढलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने, सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

