» तत्पर ग्राहकसेवा अन् कर्मचाऱ्यांच्या कामांचे विभाजन
» ८ उपविभागीय कार्यालयांची नव्याने निर्मिती
» कर्मचाऱ्यांचा ताण कमी, कामकाजात होणार सुसूत्रता
पुणे, दि. १३ ऑक्टोबर, २०२५ – महावितरण अंतर्गत थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुनर्रचनेला पुणे शहरात सोमवार (दि. १३) पासून प्रारंभ झाला असून, पुनर्रचनेमुळे पुणे शहरात ८ उपविभागांची नव्याने निर्मिती झाली आहे.
महावितरणमध्ये उपविभाग व शाखा कार्यालयांद्वारे नवीन वीजजोडणी, मासिक वीजबिल, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीज यंत्रणेची नियमित देखभाल, तांत्रिक बिघाडांची दुरुस्ती, वीजबिलांची थकबाकी वसुली, वीजहानी कमी करणे आदी कामे करण्यात येतात. त्यामुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी १० ते १२ प्रकारची कामे करावी लागत होती. तसेच ही रचना सुमारे २५ वर्षांपूर्वीची व त्यावेळच्या ग्राहकसंख्येनुसार होती. मात्र त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि ग्राहकसेवेवर होत असल्याने व्यवस्थापनाने विशेष समिती स्थापन करून कर्मचारी संघटनांशी वेळोवेळी चर्चा करून पुनर्रचनेचे प्रारूप तयार केले आहे.
नविन रचनेत प्रामुख्याने थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांच्या पुनर्रचनेवर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहरी, ग्रामीण व दुर्गम भागांतील ग्राहकसंख्या व भौगोलिक क्षेत्रानुसार संबंधित उपविभाग व शाखा कार्यालयांची फेररचना करण्यात आली आहे. सोबतच ग्राहकसंख्येनुसार अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
महावितरणच्या रास्तापेठ व गणेशखिंड शहर मंडलांतर्गत पुणे महानगराचा भाग येतो. या शहरी भागातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी पूर्वी २९ उपविभाग होते. आता वीजपुरवठा आणि बिलींगसाठी स्वतंत्र उपविभाग झाल्याने आठ उपविभागांची नव्याने निर्मिती झाली आहे. तर पुणे ग्रामीण मंडलांतर्गत उपविभागांची संख्या १५ असून, तिथेही कामकाजात बदल करण्यात आला आहे.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे, रास्तापेठचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, पुणे ग्रामीणचे अधीक्षक अभियंता युवराज जरग यांचेसह सर्व कार्यकारी अभियंत्यांनी सर्व उपविभागातील कर्मचाऱ्यांना नवीन रचनेनुसार कामकाज सुरु करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारपासून कर्मचाऱ्यांनी नविन बदलानुसार नविन जबाबदारी स्विकारत कामकाजाला सुरुवात केली आहे.
कर्मचाऱ्यांचा ताण कमी, कामकाजात होणार सुसूत्रता-
पूर्वी अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी १० ते १२ प्रकारची कामे करावी लागत होती. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि ग्राहकसेवेवर परिणाम होत होता. नवीन रचनेत प्रत्येकाला कामाजी जबाबदारी निश्चित केलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, कामकाजात सुसूत्रता येणार आहे.
कामातील नविन बदल असे-
देखभाल व दुरुस्ती उपविभागातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी वीजयंत्रणेची देखभाल व दुरूस्तीचे कामे, नवीन वीजयंत्रणा उभारणे, वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कामे करतील. तर महसूल व देयके उपविभागातील अभियंते, कर्मचारी नवीन वीजजोडणी, अचूक बिलिंग, बिलिंग तक्रारींचे निवारण, थकबाकी वसुली, वीजचोरी रोखणे आदी कामे करणार आहेत.
वीजग्राहकांनी विजेसंबंधिच्या सर्व तक्रारींसाठी महावितरणच्या 1912, 18002333435 व 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. हे क्रमांक www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व वीजबिलावर प्रकाशित केले आहेत. महावितरणच्या मोबाईल ॲपवर देखील सर्व सुविधा २४ तास उपलब्ध आहेत.

