मुंबई, दि. ३ ऑक्टोबर २०२५ :
थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . या वेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव (२) श्रीमती मेघना तळेकर, सचिव (४) श्री. शिवदर्शन साठये, उप सचिव श्री. विजय कोमटवार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक व शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले. मराठवाडा मुक्ती संग्रामात त्यांचा सिंहाचा वाटा होता. स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम आणि शिक्षण चळवळीच्या माध्यमातून त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. आजही मराठवाड्यातील गावागावांमध्ये त्यांचे विचार जिवंत आहेत आणि त्यातून समाजकार्याला दिशा मिळते. विधानमंडळामार्फत आम्ही त्यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य आहे.”
कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचे स्मरण केले व त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा आदर्श घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

