जून ते ॲागस्टमधील नुकसानीसाठी असणार मदत,शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी
मुंबई -मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानभरपाई जाहीर केली आहे. खरीप 2025 मधील पिकांच्या नुकसानीसाठी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आजच जाहीर केला असून, ही रक्कम आजपासूनच वितरीत केली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी सर्वाधिक बाधित झाले होते. सरकारने केलेल्या पंचनाम्यानुसार, एकूण 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलले आहे.
पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. जाहीर झालेली मदत आजच वितरित केली जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यास मदत होईल. मराठवाड्यासह राज्यातील ज्या-ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्या सर्व भागांतील शेतकऱ्यांचा या मदतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. जून 2025 ते ॲागस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले होते. त्याकरिता ही मदत असणार आहे.
दरम्यान, जुलै महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये 721 कोटी, नाशिकमध्ये 13.77 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये पुणे विभागासाठी 14.29, नागपूर विभागाला 23.85 कोटी आणि अमरावती विभागाला 565.60 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर कोकणाला 10.53 कोटी रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही सगळी मिळून राज्य सरकारने खरीप हंगामासाठी आतापर्यंत 2200 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले होते.
राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 2 हजार 215 कोटींची मदत आतापर्यंत रिलीज करण्यात आली आहे. मात्र हे सर्व पैसे एकाच जीआरने नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या जीआरच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच ही प्रक्रिया अद्याप थांबलेली नाही. आत्तापर्यंत 2,215 कोटी रुपयांची मदत आम्ही केली आहे. त्यातले 1,829 कोटी रुपये पोहोचले आहेत. वाटप झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना पूर्ण पैसे मिळण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

