पुणे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज होणाऱ्या भारत -पाक क्रिकेट सामन्याबद्दल पुण्यात पत्रकारांनी छेडले असता ‘ मी कुठलाही सामना पाहत नाही , त्यामुळे मला माहिती नाही. अशा एका द्विअर्थी वाक्यात भारत -पाक संदर्भातील लोकभावना आणि विरोधकांचा विरोध फडणवीस यांनी उडवून लावला .
ते पुढे म्हणाले कि ,राज्यातील ओबीसी समाजाला कुठलाही धोका नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसींमध्ये समाविष्ट होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “नकली म्हणजे जो ओबीसी नाही, तो कधीच या प्रवर्गात समाविष्ट होणार नाही. त्यासाठी सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये स्पष्ट तरतूद केली आहे,” असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देताना केला.
राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणसाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भातील जीआर देखील काढला आहे. या जीआरमुळे कुणबी नोंदी असणाऱ्या मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र भेटणार असून, ओबीसीतून आरक्षणाचा लाभ भेटणार आहे. या जीआरविरोधात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून, यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त पुनरुच्चार केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “२०१४ ते २०२५ या काळात ओबीसी समाजासाठी जितके निर्णय झाले, ते केवळ आमच्या सरकारकडूनच झाले आहेत. ओबीसी वेगळे मंत्रालय आणणारे आम्ही, ओबीसींसाठी योजना आखणारे आम्ही, ‘महाज्योती’ स्थापन करणारे आम्हीच. ओबीसींसाठी ४२ नवीन वसतिगृहे देणारे आणि उद्धव ठाकरे सरकारने घालवलेले २७ टक्के राजकीय आरक्षण परत आणणारे आमचे सरकार आहे. मग ओबीसींचे खरे हित पाहणारे कोण, हे समाजाला उत्तम ठाऊक आहे.”
यापूर्वीच्या कोणत्या सरकारने ओबीसींचे हित केले? अशी विचारणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ओबीसी हिताच्या संदर्भात आम्ही केलेले काम आणि इतर सरकारांनी केले काम, यावर माझ्याशी खुली चर्चा करावी, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले. ते म्हणाले, विरोधकांना केवळ राजकारण करता येते. पण आम्हाला ओबीसी समाजाचे हित पाहायचे आहे, आणि आम्ही ते करणारच आहोत. सगळ्या समाजांचे हित आमचेच सरकार करू शकते, असा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ओबीसी समाजातील दोन तरुणांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केली आहे. यावही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जो पर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवणार नाहीत, तोपर्यंत हे तेढ कमी होणार नाही. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे. विना नोंदीचे कुणालाही प्रमाणपत्र मिळणार नाहीत. त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाहीये, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कुठेतरी आरक्षण गेलेल्याचे वातावरण तयार केले जात आहे. अशा प्रकारचे वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. दुसरीकडेही, टोकाचेच राजकारण चाललेले आहे. अशा राजकारणाने कधीच समाजाचे भले होऊ शकत नाही. समाजापर्यंत वास्तविकता पोहोचवली तरच समाजाचे भले होऊ शकते. आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवत आहोत. समाजाची काळजी आम्ही घेत आहोत. त्यामुळे नेत्यांनी कितीही राजकारण केले, तरी समाज वास्तविकता समजून घेतो, हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
पवारांनी एक्स म्हटले की, वाय समजायचे-राज्याची एकतेची वीण उसवली जात असल्याचे शरद पवार म्हणाले होते. वाट्टेल ते प्रयत्न करून आम्ही ते होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शरद पवार साहेब कशासाठी प्रसिद्ध आहेत, हे आपल्याला माहीत आहे. पवार साहेबांनी एक्स म्हटले की, वाय समजायचे. ते मोठे नेते असल्यामुळे त्यांच्यावर आणखी काय बोलणार.

