पुणे- महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आता स्वत: मैदानात उतरले आहेत , महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन करुन धमकावल्याबद्दल वादात सापडलेल्या आणि प्रतिमेला हानी पोहोचलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आता ती भरून काढण्यासाठी जनसंवाद उपक्रम सुरु करण्यात येतोय. या उपक्रमाची सुरुवात आजपासून पुण्यातील हडपसर मतदारसंघातून झाली आहे. या कार्यक्रमात तब्बल 3 हजार सातशे तक्रार निवेदनांचा अक्षरशः पाऊस पडला. ‘जनसंवाद’ कार्यक्रमात नागरिकांच्या प्रतिसादामध्ये इच्छुक उमेदवारांची लुडबुड दिसून आली. उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इछुकांनी निवेदने देण्याचा देखील प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकांचे कॅम्पेन ज्या कंपनीला देण्यात आले त्याच कंपनीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे कॅम्पेन दिलेले असून त्याच गुलाबी रंगाच्या माध्यमातून ‘जनसंवाद’ अभियानातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार असून त्याचा प्रारंभ पुण्यातून आज करण्यात आला. राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्या मतदारसंघात आहेत त्या मतदारसंघात अशाप्रकारे अभियान राबविण्यात आले तरीही येथून तक्रारीचा पडलेला पाउस पाहता हे सरकार अपयशी ठरले आहे हेच यावरून स्पष्ट होते आहे.
राष्ट्रवादीच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आमदार चेतन तुपे पाटील यांनी आयोजन केले होते. 19 विविध विभाग निहाय टेबल करुन त्याठिकाणी संबंधित खात्याच्या अधिकारी बरोबर पक्षाचे कार्यकर्ते व कॅम्पेन राबविणाऱ्या कंपनीचे स्वयंसेवक नागरिकांना मदतीसाठी नियुक्त केलेले होते. हडपसर परिसरातील विविध भागातून नागरिकांनी उदंड प्रतिसाद या अभियानास दिला. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारी बरोबर गृहनिर्माण संस्थांनी देखील या जनसुनावणीकडे धाव घेतली व वारंवार मागणी करुनही समस्यांचे निराकरण होत नाही अशा समस्या निवेदन देवून कथन केल्या. अशाप्रकारे तब्बल 3 हजार सातशे तक्रार निवेदने या कार्यक्रमात प्राप्त झाली. विविध विभागाकडे याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या व्यासपीठावरील फ्लेक्सवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा लोगो नाही. मात्र अजित पवारांच्या पार्टीचा पिंक कलर सर्वत्र वापरण्यात आला आहे. तर या कार्यक्रमाला शासना मधील सर्व अधिकारी उपस्थित आहे.यामुळे हा कार्यक्रम शासनाचा की पक्षाचा असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्या कार्यक्रमापूर्वी अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले,सर्वसामान्य लोकांना त्रास होत असतो. अशा कार्यक्रमामधून प्रश्न सुटायला मदत होत असते.त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठून तरी सुरुवात करायची असते म्हणून हडपसरमधून सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर अंजना कृष्णा यांच्या बाबत प्रश्न विचारताच अजित पवारांनी उत्तर देण टाळल्याचे पाहण्यास मिळाले.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी जनसुनावणी ठेवण्यात आली होती. या समस्या सोडविण्यासाठी पवार व्यक्तीश: लक्ष घालणार असल्याची जाहिरात सर्वत्र केल्याने नागरिकांनी या सुनावणीला मोठी गर्दी केली होती. या जनसुनावणीसाठी पवार यांच्या मुंबईच्या कार्यालयातून जिल्हा प्रशासनाला संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असल्याचे पत्र काढण्यात आले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तब्बल ३० विभागांना आपल्या प्रमुखांसह अन्य अधिकाऱ्यांना या पक्षाच्या जनसुनावणीला उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले होते. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे व्यासपीठावरच अजित पवार यांच्या समवेत उपस्थित होते. आमदार चेतन तुपे आणि अन्य पदाधिकारी मात्र, नागरिकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करत होते. सर्व ३० विभागांचे अधिकारी सभागृहात उपस्थित होते. या समस्यांमध्ये सांडपाणी व्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, कचरा तसेच काही वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या होत्या. विविध विभागांचे प्रमुख उपस्थितमात्र, जिल्हा परिषद , पिंपरी चिंचवड पोलिस, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचा पूर्व भाग, पीएमआरडी, महावितरण, राज्य रस्ते मार्ग परिवहन, एमआयडीसी, राज्य रस्ते विकास महामंडळ, मत्स्य विभाग, भूमी अभिलेख, विभागीय पर्यटन कार्यालय, कृषी विभाग, अन्नधान्य वितरण अधिकारी, जिल्हा क्रीडाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुरातत्त्व विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जलसंपदा विभाग खडकवासला प्रकल्प, पाटबंधारे विभाग, उपविभागीय अधिकारी हवेली, तहसीलदार हवेली, गटविकास अधिकारी जिल्हा परिषद आदी विभागांचे बहुतांश विभागप्रमुख तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे शहराच्या पूर्व भागातील हडपसर व मांजरी गाव या परिसरातील नागरिकांना मूलभूत व पायाभूत समस्यांना रोज सामोरे जावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने अतिक्रमण, अपुरा पाणीपुरवठा, रस्ते वाहतूक, रखडलेल्या पुलाच्या बाजूचा सर्व्हिस रोड, या प्रश्नांची सोडवणूक करावी याबाबत सविस्तर निवेदन अखिल महादेवनगर युवा मंच संस्थापक अध्यक्ष व मांजरी बु. ग्रामपंचायत माजी सदस्य प्रशांत पंढरीनाथ घुले यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. त्यांच्या समवेत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते.
प्रशांत पंढरीनाथ घुले यांनी या भागातील पाणी पुरवठा समस्या आणि तिक्रमण व रस्ते वाहतूक समस्याबाबत निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले या निवेदनात मध्ये म्हंटले आहे कि, मांजरी गावासाठी आपण स्थानिक आमदार मा चेतन तुपे यांच्या सहयोगाने व गेली 3वर्ष पाठपुरावा करून पाणी पुरवठा स्कीम केली ती पूर्ण पण झालीं आणि गाव महानगरपालीका मध्ये गेली. सदरील पाणी पुरवठा अपुरा व अखंडित स्वरूपात होत आहे. नागरिकांना पाणी मिळत नाही. महापालिका लष्कर पाणी पुरवठा केंद्रातून पाणी देते तो फक्त जुन्या हद्दीतील भागाला मिळते उर्वरित गावाचा भाग व परिसर पाण्यापासून वंचित आहे. झालेली पाणी योजना महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नीट चालत नाही. पाणी योजना असून सुद्धा पाणी दुसरी कडे दिले गेले आहे. लोकांना रोज पाणी मिळत नाही. अंतर्गत लाईन नाही त्यामुळे पुरेसा पाणी पुरवठा होत नाही ही प्रमुख व मुख्य समस्या आहे. समाविष्ट भागातील पाणी पुरवठा सुरळीत होईल याबाबतचा प्रश्न सोडवणूक करावी तसेच मांजरी गावाला जोडणारे रस्ते रेल्वे पूल लागत सर्व्हिस रॉड कामे अर्धवट व अपूर्ण राहिलेली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच अण्णासाहेब मगर कॉलेज पासून गोपाळपट्टी व रेल्वे ब्रिज नंतर मांजरी गावापर्यंत रस्त्यावर वाहन पार्किंग आणि फेरीवाले यांनी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. वाहतूक पोलिसांचे कोणतेही नियोजन या भागात नाही. अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे. विकास आराखड्यात रस्ते प्रश्न प्राधान्यांनी मार्गी लावावा. तसेच घुले वस्तीपासून साडेसतरा नळी कडे जाणारा रस्ता खराब असून अनेक दिवसांपासून काम रखडलेले आहे. वाहने कॅनॉल मध्ये जाऊन वारंवार अपघात होत आहेत. सदरील काम मार्गी लावावे अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मकता दर्शवून स्वतंत्रपणे मांजरी गावाला भेट देऊन सखोल समस्या जाणून घेईल व निवेदन मधील मुद्दे पाहून संबंधित यंत्रणेला सूचना करतो असे आश्वस्त केले.

