पुणे- अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेताना फोटो असणारी एक जाहिरात नुकतीच विविध वर्तमान पत्रांतून आणि टीव्हीवरील विविध वाहिन्यांवरून झळकली आहे. त्यात फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाल्याचे दिसून येत आहेत. या जाहिरातीत ती देणाऱ्यांचे नाव नाही, या अनामिक जाहिरातीसाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च झाल्याची चर्चा सुरु झाली आहे,औचित्य काय , कोणी , कोणासाठी या जाहिराती गणेश विसर्जनाच्या दिवशी दिल्या अशा चर्चेच्या पार्श्वभूमीवर जाहिरातीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर विशेषतः चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला होता.
रोहित पवार या प्रकरणी सरकारवर टीका करताना म्हणाले होते की, बावनकुळे साहेब, तुम्ही रोज 40 कोटी ऐवजी 400 किंवा 4000 कोटींच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निवावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल. या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?
या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? उदा. तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा 90 कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का?
या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे आपण जाहीर का करत नाही? करा जाहीर, असे ते म्हणाले होते.

