‘राज्य महोत्सवा’ बाबतची तरतुद, नियमावली किंवा निश्चित व्याख्या’ काय..?- काँग्रेस वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे – ‘गणेश भक्तां मध्ये केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्या करीता कोलेल्या घोषणे शिवाय, गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून अधिकृतपणे मान्यता देणारा शासकीय निर्णय (जीआर) अद्यापही जारी झाल्या बाबतचा उल्लेख मिळत नसून, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळांवर (www.maharashtra.gov.in) वा इतर संकेतस्थळांवर (dgipr.maharashtra.gov.in, gr.maharashtra.gov.in) अशा जीआरचा तपशील उपलब्ध नसल्याचे राज्य काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
ते पुढे म्हणाले की, गणेशोत्सव हा ‘ राज्य महोत्सव” म्हणून साजरा केला जात असतांना त्या करीताची बजेट – तरतुद, नियमावली किंवा त्याची ‘निश्चित ‘व्याख्ये’ बाबत शासकीय स्तरावर कोठे ही स्पष्टता नसल्याने, स्टंटबाजी शिवाय सरकारला या विषयी गांभीर्य नसल्याचेच स्पष्ट होते.
गणेशोत्सवात सहभागी ‘मुर्तीकार, कलाकार, मंडपवाले, वाद्ये वादक, पौरोहित्य करणारे, सेवेकरी, ढोल – ताशा पथकांचे साहीत्य वा सजावट साहीत्य वा सेवे’ वरील जीएसटी माफ करण्यात आला काय…? वा सवलत देण्यात आली आहे काय..?
या उत्सवाचा ताण झेलत, गणेशोत्सव रात्रंदिवस सुरक्षितपणे व शांततेने पार पाडण्या करीता झटणारे ‘पोलीस – दला’स विशेष रजा – सुट्टी वा सवलत इ जाहीर केली काय..?
आमदारांचे मागणी प्रमाणे गणेशोत्सवा’साठी 100 कोटी रु. निधीची मागणी होती. गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी पुणे शहरात G20 परिषदेच्या धर्तीवर व्यवस्था, पोलिसांची अतिरिक्त कुमक, आणि पंढरपूर वारीप्रमाणे व्यवस्थापनाची मागणी होती. तसेच गणेशोत्सव काळात तालुका ते राज्य स्तरावरील सांस्कृतिक स्पर्धांसाठी 10 कोटी रुपये बक्षिसे ठेवण्यात आली आहेत काय..? गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्याने राज्य सरकार गाव आणि शहरांमध्ये उत्सवाच्या खर्चाचा काही भाग उचलणार आहे काय (?) ज्यामुळे समावेशिता आणि पारंपरिकता होईल. गणेशोत्सव मंडळांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचेही सरकारचे धोरण आहे काय..?
सुरक्षा आणि पायाभूत सुविधा:
राज्याचा उत्सव साजरा करताना सामाजिक भान, पर्यावरण पूरकता आणि पर्यटक – भाविकांचा उत्साह यांचा समन्वय साधण्यासाठी सरकारने पोलिसांची अतिरिक्त कुमक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रायोजन केले आहे काय..?
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाला महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून संबोधले व उत्सवाला सामाजिक एकता, राष्ट्रीयत्व, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाशी जोडले असून गणेशोत्सव” सर्व धर्म, जात आणि भाषांना” जोडणारा उत्सव असावा, अशी भूमिका असल्याचे समजते. मात्र प्रत्यक्षदर्शी अंमलबजावणी शुन्य असल्याची टीका ही काँग्रेस ने केली.
याच धर्तीवर, तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने ‘दही हंडी’ला राज्य क्रीड़ा दर्जा देण्याचे जाहीर करूनही, प्रत्यक्ष तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार केल्याची पुस्ती ही तिवारी यांनी जोडली.

