पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणारे उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे उद्घाटन अखेर फक्त शरद पवार यांच्या हस्तेच झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने उरुळी ग्रामपंचायतीचे कामकाज साकारण्यात आले आहे, त्यामुळे त्यांनी उपस्थित राहावे अशी गावकऱ्यांची अपेक्षा होती. तसेच, नवीन महानगरपालिका उभारण्याच्या प्रक्रियेत उरुळी कांचनचा समावेश होणार आहे. गावासाठी अनेक प्रस्ताव अजित पवार यांनी केले आहेत. यापूर्वी उरुळी कांचनमधील शाळा, रस्ते आणि इतर विकासकामे शरद पवार यांच्या हस्तेच झालेली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी या कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार आणि अजित पवार यांच्या संयुक्त हस्ते व्हावे, अशी मागणी केली होती. परंतु गेल्या अनेक कार्यक्रमांत अजित पवार, शरद पवारांसोबत मंचावर येणं टाळत असल्याचे चित्र दिसून आले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्येही शरद पवारांच्या शेजारी बसणं अजित पवार टाळत असल्याचे उदाहरण पाहायला मिळाले आहे. त्यामुळे दोघे एकत्र आल्यावर नेहमीच राजकीय चर्चांना उधाण येते.दरम्यान, मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोणता निकाल लागतो किंवा मनोज जरांगे यांना काय दिलासा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अजित पवार सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईला
Date:

