पुणे-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे निघालेल्या एका आंदोलकाचा जुन्नरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असे मृत पावलेल्या आंदोलकाचे नाव असून, ते केज तालुक्यातील वरडगाव येथील रहिवासी होते. या घटनेवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देताना संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणसाठी याआधीही अनेकांनी बलिदान दिले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने पदयात्रा सुरू केली आहे. मोर्चाचा जुन्नर येथे पहिला मुक्काम होता. सतीश देशमुख हे देखील मनोज जरांगेसोबत मोर्चात सहभागी झाले होते. जुन्नरमध्ये असताना सतीश देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी सतीश देशमुख यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे मराठा समाजामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
आंदोलकाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर मनोज जरांगे यांच्यासह संपूर्ण मराठा आंदोलकांमध्ये दु:खाची लाट पसरली. याबाबत जरांगेंनी देखील संवेदना व्यक्त केल्या आहेत. मराठा आरक्षणाचा लढा मुंबईच्या दिशेनं जाताना ही दुर्दैवी घटना घडली. सतीश भैय्याचे आताच बलिदान गेले. हे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही. त्यामुळे आपण संयमाने आंदोलनाची लढाई लढू, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी लातूरच्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात एका मराठा बांधवाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोज जरांगे मुंबईला निघण्याच्या एक दिवसआधी घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. बळीराम मुळे (वय ३५) असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बळीराम मुळे याने आपल्या खिशात एक चिठ्ठी ठेवून विष प्राशन केले. या चिठ्ठीत त्याने सरकारवर ‘मराठा आरक्षणावर वेळकाढूपणा’ करत असल्याचा आणि ‘जरांगे पाटलांना वारंवार उपोषणाची वेळ आणत असल्याचा’ आरोप केला. या घटनेची माहिती मिळताच, नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्याला तात्काळ लातूरच्या रुग्णालयात दाखल केले, ज्यामुळे त्याचा जीव वाचला.

