नवी दिल्ली, दि. २४ ऑगस्ट २०२५ —
दिल्ली विधानसभेचे पहिले निवडून आलेले भारतीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यभारग्रहणाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित अखिल भारतीय पीठासीन अध्यक्षांच्या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. या दोन दिवसीय अधिवेशनाला नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजयेंद्र गुप्ता, केंद्रीय पर्यटन मंत्री गिरेन्द्र सिंह शेखावत यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या विशेष अधिवेशनात महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रभावी भाषण करून भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील महाराष्ट्राच्या गौरवशाली योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबई हे सदैव केंद्रस्थान राहिले आहे. १८५७ च्या उठावावेळी मरीन बटालियनचे सैयद हुसेन आणि मंगळ गडिया या वीरांनी प्राणाची आहुती दिली. पुढे भगतसिंह, सुखदेव आणि महाराष्ट्राच्या सुपुत्र राजगुरु यांनी केलेले बलिदान संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरले.
डॉ. गोऱ्हे यांनी लोकमान्य टिळकांचा विशेष गौरव केला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” या त्यांच्या घोषणेने संपूर्ण देश जागृत झाला. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून टिळकांनी समाजाला संघटित केले आणि आजही हा उत्सव युवकांच्या संघटनाचा आधार आहे, असे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधींनी मुंबईतून “भारत छोडो” आंदोलनाची हाक दिल्याचे त्यांनी आठवले. महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वि.दा.सावरकर, सरोजिनी नायडू, अरुणा आसफ अली आणि उषा मेहता यांच्या योगदानामुळे मुंबई केवळ आर्थिक राजधानी नव्हे, तर स्वातंत्र्यआंदोलनाची राजधानी होती, असेही त्या म्हणाल्या. त्याचबरोबर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि गोपाल गणेश आगरकर यांसारख्या समाजसुधारकांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी आवश्यक अशी सामाजिक पायाभरणी केली, याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
शिवाजी महाराजांचे शौर्य, पेशव्यांचे पराक्रम, अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाईंचे योगदानही डॉ. गोऱ्हे यांनी स्मरणात आणले. “इतिहासातील या पराक्रमी गाथा केवळ स्मरणापुरत्या मर्यादित ठेवायच्या नाहीत, त्या पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवून प्रेरणा घेणे ही आपली जबाबदारी आहे,” असे ठामपणे सांगून त्यांनी आपल्या विचारांचा समारोप केला.
सभागृहातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. भाषणाच्या शेवटी डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि “जय हिंद, जय महाराष्ट्र” या घोषवाक्याने आपले भाषण संपवले.

