मुंबई-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापू लागले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला असून, यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र तो सनदशीर पद्धतीनेच असायला हवा. जर आंदोलन करताना कायद्याचे उल्लंघन होणार असेल, तर सरकार कारवाईस पात्र ठरेल, असा स्पष्ट इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनोज जरांगे यांनी कागद-पेन घ्या आणि सरकारसमोर चर्चेला यावे. आरक्षणाबाबत-च्या मागण्या शांततेत मांडल्यास त्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असे पाटील यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षण उपसमितीचे पुनर्गठन केले असून, आता या समितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील हेच या समितीचे अध्यक्ष होते. या बदलावर बोलताना पाटील म्हणाले, एकाच माणसाने किती वेळ काम करायचं? मी बराच काळ अध्यक्ष होतो, पण मी अजूनही समितीत आहे. माझ्या कार्यकाळात अनेक लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज महाराष्ट्रातील प्रमुख घटक आहेत आणि ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जरांगे पाटील यांच्या मागण्या किंवा मराठा समाजाच्या उन्नती साठीच्या मागण्या चांगल्या पद्धतीने कशा पुढे नेता येतील, यावर सरकार लक्ष देईल. आंदोलन करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे काही करणे आवश्यक असेल ते सरकार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

